शालेय पातळीवर समाजशास्त्र या विषयातील एक महत्त्वाचा घटक असलेल्या इतिहास या विषयाचा अभ्यासक्रमाचा भाग म्हणून रामायण आणि महाभारत ही महाकाव्यं शाळेमध्ये शिकवली जावीत, अशा प्रकारची शिफारस एनसीईआरटीच्या एका महत्त्वाच्या समितीने केली आहे. यावरून आगामी कालावधीमध्ये पुन्हा एकदा चर्चा रंगण्याचे संकेत मिळत आहेत. इयत्ता तिसरी ते बारावी या कालावधीमध्ये जो इतिहास शिकवला जातो त्यामध्ये जाणीवपूर्वक रामायण आणि महाभारत या महाकाव्यांचा समावेश करावा, असे या समितीने म्हटले आहे. मुलांच्या मनात अगदी कमी वयात जर देशप्रेमाची आणि नीतिमत्तेची भावना निर्माण करायची असेल तर या दोन महाकाव्यांचा अभ्यास अत्यावश्यक आहे, असे या समितीने आपल्या शिफारशीत म्हटले आहे. सरकारने अद्याप या शिफारसी स्वीकारण्याचा निर्णय घेतला नसला तरी आगामी कालावधीमध्ये यावर उलटसुलट चर्चा अपेक्षित आहे. खरे तर अनेक वर्षांपूर्वी शालेय पातळीवरच गोष्टीरूप रामायण आणि गोष्टीरूप महाभारत या दोन विषयांच्या माध्यमातून लहान मुलांना रामायण आणि महाभारत शिकवले जातच होते.
आजही काही राज्यांमध्ये अभ्यासक्रमामध्ये रामायणाच्या कथांचा समावेश आहे. पण हे रामायण जेव्हा शिकवले जाते तेव्हा ते मायथॉलॉजी किंवा पुराणकथा आहे असा उल्लेख करून शिकवली जाते. पण आता रामायण आणि महाभारत ही दोन महाकाव्ये इतिहास म्हणून शिकवली जावीत अशी शिफारस करण्यात आल्याने त्याला विशिष्ट महत्त्व आहे. आजवर रामायण आणि महाभारतावर जे काही संशोधन झाले आहे त्याचा विचार करता रामायण आणि महाभारत याकडे केवळ महाकाव्यं न बघता इतिहास म्हणून बघावे अशा प्रकारची मांडणी यापूर्वी काही इतिहासकारांनी केली आहे. रामायण आणि महाभारत या घटना कधी घडल्या यावर काही इतिहासकारांनी संशोधन केले आहे. त्यामुळे रामायण असो किंवा महाभारत असो तो एक इतिहास आहे हे मान्य करायचे झाले, तरी या दोन्हीही महाकाव्यांना चमत्कारयुक्त घटनांची झालर आहे, त्याचे काय करायचे याचा विचार करण्याची गरज आहे. रामायण असो किंवा महाभारत असो या दोन्हीही महाकाव्यांतील अनेक घटना चमत्काराने भरलेल्या आहेत.
खरेतर या सर्व चमत्कारांचे लौकिक अर्थही लावणे सहज शक्य आहे आणि अनेक इतिहासकारांनी ते लावले आहेत. पण रामायण आणि महाभारतामधील महापुरुषांना आपण देवाचा दर्जा दिला असल्यानेच त्यांनी चमत्कार करूनच पराक्रम केला ही मानसिकता जी भारतीय समाजमनाची तयार झाली आहे त्याच्या विरोधात जाण्याची कोणाचीही तयारी नाही. साहजिकच आता शालेय पातळीवर रामायण आणि महाभारत शिकवण्यात येणार असेल तर त्यातील या चमत्कारयुक्त प्रसंगांचे काय करायचे याचाही विचार करावा लागणार आहे. महर्षी वाल्मिकींनी लिहिलेले रामायण असो किंवा व्यासांनी लिहिलेले महाभारत असो दोन्ही ग्रंथांवर नंतरच्या शेकडो वर्षांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर संशोधन आणि ग्रंथरचना झाली आहे की प्रत्येक ठिकाणी लेखकाने आपल्या मनाच्या काही गोष्ट घालून महाकाव्यांबाबत गोंधळ वाढवून ठेवला आहे. महर्षी व्यास यांनी लिहिलेल्या जय या मूळ ग्रंथामध्ये भगवद्गीताही असल्याने भारतीय लोकांसाठी हा ग्रंथ पूजनीय आहे. रामायण किंवा महाभारत या ग्रंथांचा विचार करून नंतरच्या कालावधीमध्ये जे प्रचंड लिखाण झाले त्यामुळेच भारतीय समाजमनामध्ये अनेक गैरसमज तयार झाले आहेत.
रामायण आणि महाभारत या महाकाव्यांना इतिहास मानायचा असला तर या दोन्ही महाकाव्यात असलेली पात्रे ही मानवी पात्रे होती ही गोष्टही मान्य करावी लागणार आहे. गेल्या हजारो वर्षांच्या कालावधीमध्ये अनेक ग्रंथांमध्ये लेखकांनी रामायण आणि महाभारतामधील प्रमुख पात्रांना मानवापेक्षाही महामानवाचा म्हणजे सुपरमॅनचा म्हणजेच देवाचा दर्जा दिला असल्याने नक्की हा इतिहास शालेय पातळीवर कसा शिकवायचा याबाबत गोंधळ निर्माण होणार आहे. जगात ज्या काही गोष्टी आतापर्यंत घडलेल्या आहेत त्या महाभारतामध्येसुद्धा घडून गेल्या आहेत, असे नेहमी मानले जाते. म्हणजेच महाभारतासारख्या महाकाव्याला कोणताही विषय निषिद्ध नव्हता. दुसरीकडे, रामायणासारख्या ग्रंथामध्ये बंधुप्रेम आणि नीतिमत्ता, प्रामाणिकपणा यासारख्या विषयांना महत्त्व देण्यात आले होते.
पण रामचंद्रांच्या महानपणाला नेहमीच आव्हान देणारे जे टीकाकार आहेत ते रामायणातील सीतेची अग्निपरीक्षा असो किंवा उत्तर रामायणामध्ये तिला संशयावरून घराबाहेर काढण्याचा प्रसंग असो या प्रसंगांचा उल्लेख करून वादाची परिस्थिती निर्माण करत असतात. साहजिकच रामायण किंवा महाभारतामधील असे जे वादग्रस्त किंवा शंकास्पद प्रसंग आहेत त्यांचा समावेश कसा करायचा, याचाही गंभीर्याने विचार करावा लागणार आहे. परदेशामध्ये जेव्हा ग्रीक रोमन किंवा इतर प्राचीन संस्कृतीचा इतिहास शालेय पातळीवर शिकवला जातो तेव्हा या इतिहासाशी संबंधित सर्व प्रमुख पात्रांना त्यांच्या गुणदोषांसकट विद्यार्थ्यांसमोर मांडले जाते.
कारण पाश्चिमात्य देशातील या पुरातन इतिहासातील पात्रांपैकी कोणालाही देवाचा दर्जा देण्यात आलेला नाही. भारतामध्ये मात्र रामायण, महाभारतामधील अनेक पात्रांना देवाचा दर्जा देण्यात आल्यामुळे त्यांच्याविषयी लिखाण करत असताना ते वादग्रस्त किंवा शंकास्पद होण्याची शक्यता जास्त आहे. शेकडो वर्षे प्रचलित असलेल्या एखाद्या भावनेला धक्का पोहोचण्याचीही शक्यता त्यामुळे निर्माण होते. म्हणूनच एनसीईआरटीच्या समितीने शिफारस केल्याप्रमाणे जर शालेय अभ्यासक्रमामध्ये रामायण, महाभारत या महत्त्वाच्या महाकाव्यांचा समावेश करायचा असेल तर विद्यार्थ्यांसमोर या महाकाव्याची मांडणी कशा प्रकारे करावी याचा गांभीर्यानेच विचार करावा लागणार आहे. रामायण आणि महाभारत महाकाव्यांवर आजपर्यंत प्रचंड प्रमाणात लिखाण झाले असल्याने शालेय अभ्यासक्रम म्हणून ही दोन महाकाव्य निवडताना नक्की कोणत्या लेखनाची निवड करायची तेही महत्त्वाचा ठरणार आहे.
त्याचबरोबर भारतात शैक्षणिक संस्थांमधून धार्मिक शिक्षण देण्यास कायद्याने बंदी आहे, तेव्हा घटनादुरुस्ती करणे अपरिहार्य ठरेल. रामायण, महाभारत हे दोन्ही ग्रंथ हिंदू धर्माशी संबंधित आहेत मात्र भारतात विविध धर्मांचे लोक राहतात, त्यामुळे त्यांच्यावर ही जबरदस्ती करण्याचाच प्रकार होऊ शकतो. त्याचबरोबर यामागे काही राजकीय हेतूही आहे काय, या मुद्द्यांवरही समाधानकारण उत्तर शोधावे लागतील. नाहीतर येत्या काही दिवसांमध्ये याबाबत ज्या उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होतील त्याची दखल घेऊनच सरकारला अंतिम निर्णय घ्यावा लागेल. कारण इतिहास हा विषय कोणतीही छेडछाड न करता शिकवणे अपेक्षित असते.