– संदीप वाकचौरे
इप्सॉस ग्लोबल ट्रस्टवर्दीनेस इंडेक्स 2023 चा अहवाल विविध क्षेत्रावर लोकांचा किती विश्वास आहे यावर आधारित आहे. त्याबाबत…
आज भोवतालमध्ये अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. समाजातील प्रत्येक क्षेत्रातील मनुष्यबळावर अधिकाधिक विश्वास वृद्धिंगत होण्याची गरज आहे. अविश्वासाच्या अंधकारात आपण फार प्रगतीचे आलेख उंचावू शकणार नाही. समाजात विविध क्षेत्रावरील विश्वास कमी होतो आहे. अविश्वास समाजाच्या विकास प्रक्रियेवर विपरित परिणाम करणार यात शंका नाही.
इप्सॉस ग्लोबल ट्रस्टवर्दीनेस इंडेक्स 2023 चा अहवाल नुकताच प्रकाशित झाला. त्या अहवालानुसार भारतातील विविध सेवा क्षेत्रांतील लोकांवरील विश्वास सातत्याने कमी होत असल्याचे समोर आले आहे. आपल्या देशात असा एकही पेशा नाही की, ज्यावर लोकांचा पूर्णतः विश्वास आहे. साधारण पन्नास टक्क्यांच्या आसपास शिक्षक, डॉक्टर आणि वैज्ञानिक यांच्यावर विश्वास व्यक्त झाला आहे. ज्यांच्या हाती देशाचे भविष्य आहे, अशा लोकशाहीतील राजकीय नेतृत्व यांच्यावरील विश्वासाचे प्रमाणात मोठी घट झाली आहे.
हा अविश्वास लोकशाहीच्या व्यवस्थेसाठी घातक ठरणारा आहे. आज आपण लोकशाही व्यवस्था भक्कम करण्यासाठीची पावले टाकत आहोत. मात्र राजकीय क्षेत्रातील नेत्यांनी जनतेचा विश्वास गमावल्यास त्यांच्या धोरणाची अंमलबजावणीची प्रक्रिया गतिमान कशी होणार? राष्ट्र प्रगतीचे पावले टाकून विकासाकडे झेप कशी घेणार?
आपल्याला ज्या क्षेत्रात यश मिळवायचे आहे त्या क्षेत्रातील मनुष्यबळाचा एकमेकांवर विश्वास असायला हवा असतो. अविश्वासाच्या वातावरणात प्रगतीचा आलेख फार उंचावत नाही. जगातील विविध व्यावसायिक क्षेत्रातील कार्यरत असणाऱ्या लोकांवर नागरिकांचा किती विश्वास आहे हे त्या अहवालाने दर्शित केले आहे. जागतिक स्तरावर अधिकाधिक विश्वास डॉक्टरांवर व्यक्त झाला आहे. भारतात मात्र डॉक्टर तिसऱ्या स्थानावर आहेत. वैद्यकीय क्षेत्रात जे काही प्रकार जनतेच्या समोर येत आहेत त्यामुळे अविश्वास व्यक्त होतो आहे.
या क्षेत्रात सामान्यांची जी लुटमार झाली, फसवले गेले, कट प्रॅक्टीसच्या नावाखाली जे काही सुरू आहे त्यातून सामान्यांचा विश्वास गमावणे घडत आहे. वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे डॉक्टर भारतीयांना नेहमीच देव वाटत आले आहेत. शंभर टक्के विश्वास ठेवणारी पिढी या भूमीने पाहिली आहे. सध्या जे काही समोर येते आहे त्याचा तो दुष्परिणाम म्हणून विश्वास गमावणे घडत आहे. गेल्या काही वर्षांत वैद्यकीय सेवेत पैसा वर्चस्व गाजवू लागला आहे. सेवाभाव कमी होतो आहे. वैद्यकीय शिक्षण महाग होत असल्याने पैसा ओतून शिक्षण घेणारी पिढी पैसा मिळवण्यासाठी वाममार्गी चालते आहे. हे एक चक्रच आहे.
मात्र या चक्राचा परिणाम म्हणून विश्वास गमावणे घडते आहे. या क्षेत्रात सामान्यांना आधार मिळण्याची आशा धुसर बनते आहे. विश्वासच रुग्णाला आजारपणातून बाहेर काढत असतो. ग्राहक आणि विक्रेता हे नाते विश्वासनिर्मितीतूनच अधिक भक्कम करत जाणारे ठरेल.
जागतिक स्तरावर शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिक्षकांवर विश्वास असण्याचे प्रमाण तिसऱ्या स्थानावर आहे. भारतात विविध व्यावसायिकांपैकी सर्वाधिक विश्वास असणारा शिक्षकीपेशा हा प्रथम स्थानावर आहे. जपान आणि दक्षिण कोरिया वगळता जगातील इतर देशातील नागरिकांचा शिक्षकांवर अधिक विश्वास असल्याचे दिसून आले आहे. भारतातील विविध पेशातील लोकांवरील विश्वासासंदर्भातील प्रमाणाचा विचार करता दुसऱ्या स्थानी सशस्त्र दल आहे.
त्यांच्यावर 52 टक्के लोकांनी विश्वास व्यक्त केला आहे. तिसऱ्या स्थानी डॉक्टर असून त्यांच्यावर 51 टक्के लोकांनी विश्वास व्यक्त केला आहे. भारतातील वैज्ञानिकांवर 49 टक्के, न्यायाधीशांवर 46 टक्के, महिलांवर 46 टक्के, बॅंकर 45 टक्के, पाद्री आणि पुरोहित 34 टक्के, पोलीस 33 टक्के, सरकारी कर्मचारी 32 टक्के, वकील 32 टक्के इतके विश्वासाचे प्रमाण आहे. जागतिक पातळीवर विश्वासाचे प्रमाणाचा विचार करता डॉक्टरांवर 58 टक्के विश्वास आहे, तर वैज्ञानिकांवर 57 टक्के विश्वास असल्याचे दिसून येत आहे.
त्या खालोखाल शिक्षक 53 टक्के, सशस्त्र दलावरही 53 टक्के विश्वास आहे. भारतात कॅबिनेट मंत्री आणि सरकारी अधिकारी यांच्यावर 39 टक्के आणि राजकारण्यावर 38 टक्के विश्वास व्यक्त झाला आहे. जगात 60 टक्के लोकांनी राजकारण्यांना सर्वात अविश्वासू मानले आहे. जे राज्यकर्ते देशाच्या विकासाचे धोरण आखतात त्यांच्यावर विश्वास नसेल तर विकासाचे चाक गती कशी घेणार हा प्रश्न आहे. येथील राजकारण्यांसाठी अविश्वास हा धोक्याचा इशारा आहे.
भारतात शिक्षकांवर विश्वासाचे प्रमाण 53 टक्के असल्याचे अहवालातून समोर आले आहे. याचा अर्थ 47 टक्के विश्वास गमावणे झाले. याचा विचार करण्याची नितांत गरज आहे. शेवटी शिक्षकांवरील विश्वास हा सामाजिक विकासाच्या प्रक्रियेत अधिक महत्त्वाचा धागा आहे. शिक्षणातून केवळ अक्षराची साक्षरता नाही तर उद्याचे राष्ट्र घडण्याची पायाभरणी होत असते. त्यामुळे तेथे कार्यरत असणाऱ्या मनुष्यबळाची विश्वासार्हता अधिक वाटायला हवी. शिक्षकी पेशात विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांचा एकमेकावर विश्वास असेल तर शिकणे परिणामकारक होण्यास मदत होत असते. शिक्षण हे ज्ञानदानाचे पवित्र मंदिर मानले जात होते.
आज त्या मंदिराचे स्वरूप बदलत चालले आहे. शाळा आणि शिक्षक हे ज्ञान, माहिती विक्री करणारी केंद्र ठरू लागली आहे. शिक्षण विकले जाते आणि ते विकत घेतले जाते ही धारणा अधिक पक्की होत चालली आहे. त्यामुळे शिक्षकांवरील विश्वास गमावणे तर घडत नाही ना? शेवटी शिक्षकीपेशा हा धर्म आहे. तेथे काम करणारी माणसं ही नोकर नाहीत तर राष्ट्राचे निर्माते असतात असे मानले जात होते. आपल्या संस्कृतीत आई-वडिलांनंतर सर्वात महत्त्वाचे आणि वरचे स्थान कोणाला असेल तर ते शिक्षकांना आहे. आज त्या उंचीला धक्का लागत असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे.
राजकारणी देशाचे धोरण आखत असतात. मात्र त्यांच्यावर जर विश्वास नसेल तर ती जी व्यवस्थेवर स्वार आहेत त्या व्यवस्थेबद्दल जनमानसाच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण होते. राजकारणी विकासाभिमुख असतात, त्यांच्या धोरणात राष्ट्र व समाजहीत सामावलेले असते ही धारणा जनसामान्यांच्या मनात पक्की व्हायला हवी. राजकारणी जनतेच्या अधिक विश्वासाला पात्र ठरायला हवी. मात्र दुर्दैवाने लोकशाहीत मतासाठी, सत्तेसाठी सर्व काही असा विचार करत होणाऱ्या निवडणुका, होणारी भाषणे, दिली जाणारी आश्वासने, निवडणुकी दरम्यान होणारे निर्णय, राजकीय हितासाठी धर्माधर्मात, जातीपातीत होणारे संघर्ष हे सारेच जनता अनुभवत असते.
वेळ आली तर केवळ निवडणुकीचा जुमला म्हणून त्याकडे राजकारणी दुर्लक्ष करत जातात; पण या सर्व प्रक्रियेचे फलित म्हणून राजकारण्यावरील अविश्वास वाढत जाणे असते हेही लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे राजकारणी जे काही निर्णय घेतात ते सामान्यांसाठी नाही तर मतासाठी घेतात ही धारणा जनमताची पक्की होत चालली आहे. राजकारण्यांवरील अविश्वासामुळे नागरिकांची लोकशाहीतील सक्रियता कमी होण्याचा धोका आहे. त्यातून मतदानाचा टक्का देखील घसरला जाऊ शकतो.
हा अविश्वास असाच वाढत गेला तर त्याचे परिणाम भविष्यात राष्ट्राच्या विकासावर होण्याची शक्यता आहे. अविश्वासाचा अंधकार नष्ट करून विश्वासाचा प्रकाश निर्माण केल्याशिवाय येथील सामान्य जनतेच्या आयुष्यात विकासाची प्रकाश किरण पोहचणार नाहीत. त्यामुळेच अधिक गंभीरतने विचार करण्याची गरज आहे. हा अविश्वास सर्वच क्षेत्रातील मनुष्यबळाला विचार करायला लावणारा आहे.