श्री प्रभूरामचंद्राची जन्मभूमी असलेल्या अयोध्या येथे रामलल्लाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा आज सोमवारी होणार आहे. त्यानिमित्ताने संपूर्ण भारत आणि जगाचा काही भागही राममय झाला आहे. या सोहळ्याबद्दल मतमतांतरे आणि विरोधाभास असले, तरी संपूर्ण देश या सोहळ्यासाठी उत्सुक आहे, हे वास्तवही नाकारून चालणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सत्तेत असलेल्या भाजपच्या निवडणूक जाहीरनाम्यात जो प्रमुख विषय गेले कित्येक वर्षे होता त्या रामजन्मभूमीच्या विषयाला या निमित्ताने पूर्णविराम मिळणार असल्याने निश्चितच हा एक धार्मिक विषय न राहता राजकीय विषयही ठरला आहे. लोकसभा निवडणूक दोन-तीन महिन्यांवर आली असतानाच अशा प्रकारे राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा घ्यावा की न घ्यावा याबाबत जरी सुलट मते असली तरी भाजपसारख्या पक्षासाठी जो निवडणुकीचा नेहमीचा विषय होता त्यांनी या विषयाचा फायदा घेणे उघड आहे. खरे तर राम मंदिर उभारणी हा भाजपाचा विषय असला तरी त्याची सुरुवात काँग्रेसच्या काळात राजीव गांधी पंतप्रधान असताना वादग्रस्त ठिकाणची कुलपे तोडून झाली होती.
1985च्या कालावधीनंतर जेव्हा काँग्रेसने आणि त्यानंतर व्ही. पी. सिंग यांच्या सरकारने मंडल आयोगाचा विषय समोर आणला तेव्हा त्याला उत्तर देण्यासाठी भाजपने राम मंदिराचा विषय समोर आणला होता. लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली रथयात्राही काढण्यात आली होती. ही रथयात्रा अडवल्याच्या कारणावरून भाजपने तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांचा पाठिंबाही काढून घेतला होता. त्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये भाजपच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये ‘मंदिर वही बनायेंगे’ ही घोषणा असायची. पण गेल्या दहा ते पंधरा वर्षांच्या कालावधीमध्ये सर्वोच्च न्यायालय पातळीवर या विषयाचा वेगाने पाठपुरावा घेण्यात आल्याने सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या येथे बाबरी मशिदीच्या जागी पूर्वी राम मंदिर होते हा मुद्दा मान्य केल्याने त्या ठिकाणी राम मंदिर बांधण्याचा विषय समोर आला आणि काही वर्षांच्या कालावधीमध्येच या ठिकाणी राम मंदिराची उभारणी झाली आहे.
गेल्या महिन्याभराच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतशीरपणे या संपूर्ण सोहळ्याचे नियोजन करण्यात येत आहे आणि देश पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा ज्याप्रकारे वातावरण निर्मिती करण्यात येत आहे ते पाहता याचा राजकीय लाभ मिळण्याची शक्यता आणि आशा भाजपाला निश्चितच असणार आहे. हिंदू धर्मियांचे सर्वोच्च स्थान म्हणून अयोध्या नगरीची ओळख यापुढे निर्माण होऊ शकते. आज 22 जानेवारी रोजी देशाच्या अनेक राज्यांमध्ये स्थानिक पातळीवर सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. सकाळी 11 वाजता अयोध्येत जेव्हा प्राणप्रतिष्ठा होणार आहे तेव्हा आपापल्या गावात प्रत्येकाने हा सोहळा साजरा करावा, अशा प्रकारचे आवाहनही करण्यात आले आहे. त्याची तयारी जोरदारपणे करण्यात येत आहे. स्थानिक पातळीवरील नेत्यांसाठीसुद्धा ही लोकप्रिय होण्याची पर्वणीच असल्याने त्यांनीसुद्धा या कामामध्ये कोणतीही कसूर ठेवलेली नाही.
सर्व इलेक्ट्रॉनिक्स माध्यमे आणि इतर माध्यमांनीसुद्धा गेले काही दिवसांपासून हाच विषय मोठ्या प्रमाणावर चर्चेसाठी घेतला आहे. साहजिकच संपूर्ण भारतच सध्या राममय झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नेतृत्वाखालील सरकार या विषयातील धार्मिक महत्त्व अजिबात नाकारत नाही. भारतीय संस्कृतीची एकूण रचनाच प्रतिमापूजनाची असल्यामुळे अशा प्रकारच्या सोहळ्यांना महत्त्व प्राप्त होणे साहजिकच असले तरी प्रभू श्रीराम सारख्या महापुरुषासाठी हा सोहळा होत असताना या महापुरुषाचे किती विचार प्रत्यक्षात अमलात आणले जात आहेत याचा धांडोळाही वैयक्तिक पातळीवर प्रत्येकाने घेण्याची गरज आहे. प्रभू श्रीरामाचे चरित्र एवढे अद्भुत आहे की त्याचे लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न हे सावत्र भाऊ आहेत हे पटकन कोणाच्या लक्षातही येत नाही. बंधुप्रेमाची एक वेगळीच उंची आपल्याला श्रीरामाच्या चरित्रात पाहायला मिळते. प्रत्यक्षात मात्र वैयक्तिक पातळीवरील बंधुभाव असो किंवा सामाजिक पातळीवरील शेजार्यांमधील बंधुभाव असो त्याची पातळी आता किती प्रमाणात घसरली आहे याचीही तुलना होण्याची गरज आहे.
प्रभू राम यांनी जो राज्यकारभार केला त्याचे वर्णन रामराज्य असे केले जाते. म्हणजेच रामाच्या राज्यामध्ये सर्वच गोष्टी आदर्श अशा होत्या आणि न्यायप्रिय पद्धतीने राज्यकारभार केला जात होता. भारतीय राजकारणाने राजकारणाची जी हिन पातळी गाठली आहे त्यामध्ये रामराज्याची ही संकल्पना कोठे बसते हेसुद्धा या निमित्ताने पहावे लागणार आहे. श्रीराम चरित्र केवळ पारायण करण्यासाठी नाही तर ते अनुकरण करण्यासाठी आहे हे समस्त भारतीयांनी लक्षात घ्यायला हवे. राजकीय पातळीवर विचार करता भाजपाचा हा फक्त एक निवडणुकीतील यश मिळवण्यासाठीचा विषय होता आणि गेल्या काही वर्षातील अनेक निवडणूक जाहीरनाम्यांमध्ये त्यांनी जे आश्वासन दिले होते ते आश्वासन अखेर त्यांनी पूर्ण केले आहे. भारतासारख्या विविधतेने नटलेल्या सांस्कृतिक आणि धार्मिक देशांमध्ये अयोध्येतील मंदिरासारखी एखादी वास्तू नव्याने निर्माण होणे महत्त्वाचेच मानावे लागेल.
या निमित्ताने आंतरराष्ट्रीय पातळीवरसुद्धा पर्यटनाच्या नकाशावर भारताची ओळख अधिक गडद होणार आहे. या सर्व गोष्टी होत असल्या तरी या अशा घटनांचा फायदा कोणी समाजकंटक घेणार नाहीत ना हेसुद्धा या निमित्ताने सरकारला पहावे लागणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सोशल मीडियावर ज्या प्रकारे टोकाच्या पोस्ट प्रसारित होत आहेत ते पाहता विनाकारणच कोणाला डिवचण्याचा उद्योग सामाजिक अशांतता निर्माण करणारा ठरू शकतो याची जाणीवही सर्व पातळीवरील उत्साही लोकांना करून देण्याची गरज आहे. आजपर्यंतच्या घटनाक्रमामध्ये अयोध्यातील राम मंदिराचा विषयच सहाय्यभूत ठरला असल्याने भाजपने या विषयाला महत्त्व देणे जरी साहजिक असले तरी त्यामुळे समाजात दुही निर्माण होणार नाही आणि धार्मिक ध्रुवीकरण टोकाला जाणार नाही याची काळजीसुद्धा सरकारला घ्यावी लागेल.