आळंदी- करोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे आळंदीतील माउली मंदिर परिसर, इंद्रायणी घाट, चाकण चौक नाका, संतोषी माता मंदिर परिसर या ठिकाणावरील भिक्षेकरी, अनाथ, बेघर, मजूर, हाताला काम नसणारे, लॉकडाऊनमुळे गावी जाऊ न शकलेले या सर्वांना आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी समीर भूमकर व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने आळंदी नगरपरिषद शाळा क्रं.1 चाकण चौक व श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे श्री ज्ञानेश्वर विद्यालय या ठिकाणी औषधोपचार, क्वारंटाइनचे सर्व नियम पाळून तात्पुरत्या आसऱ्याची सोय करण्यात आलेली आहे.
आळंदीतील वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांच्या टिमच्या वतीने संबंधितांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. जलाराम सत्संग मंडळ यांच्या वतीने व श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगांवकर यांच्या माध्यमातून अन्नदान निवास व्यवस्था करण्यात आली आहे. निवाऱ्याच्या ठिकाणी नगरपरिषदेच्या मार्फत औषध फवारणी निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.