Bharat Nyay Yatra – कॉंग्रेस पक्षसंघटनेत प्राण फुंकण्यासाठी राहुल गांधी ३५० दिवसांनंतर पुन्हा एकदा पदयात्रा करणार आहेत. पक्षाने या यात्रेचे ‘भारत न्याय यात्रा’ असे नामकरण केले आहे. इशान्येकडच्या मणिपूर येथून सुरू होणारी ही यात्रा महाराष्ट्रातील मुंबई येथे समाप्त होणार आहे. ६७ दिवसांच्या यात्रेत राहुल गांधी ६२०० किमीचा प्रवास करणार आहेत.
कॉंग्रेस सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी दिलेल्या माहितीनुसार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यात्रेला हिरवा झेंडा दाखवतील. सर्वसामान्य जनतेला राजकीय, आर्थिक आणि सामाजिक न्याय देणे हे यात्रेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
१४ राज्यांतील ८५ जिल्ह्यांतून जाणाऱ्या यात्रेची अधिकृत रूपरेषा अद्याप तयार केली गेली नसली तरी कॉंग्रेसच्या सूत्रांच्या म्हणण्यानुसार लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच सगळी आखणी केली जाणार आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ज्या १०० जागांवर कॉंग्रेसचा पराभव झाला होता त्या जागांवर कॉंग्रेसचा यावेळी फोकस असणार आहे.
भारत जोडोपेक्षा वेगळी यात्रा –
१. भारत जोडो यात्रेच्या वेळी राहुल गांधी आणि कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी पायी प्रवास केला होता. आताच्या यात्रेत पायी चालण्यासोबतच हायटेक बसचाही उपयोग केला जाणार आहे.
२. प्रेम आणि सगळ्यांना एकजुट करणे ही भारत जोडो यात्रेची थीम होती. आताची थीम समाजातील सगळ्या वर्गांना न्याय देणे ही आहे.
३. भारत जोडो यात्रेप्रमाणेही न्याय यात्रेत १४ राज्यांचा समावेश करण्यात आला आहे.
४. कॉंग्रेसचे नेते डॉ. अजय कुमार यांच्या म्हणण्यानुसार आता कमी वेळ आणि जास्त अंतर असणार आहे. जास्तीत जास्त जिल्ह्यांतून यात्रा जावी असा आमचा प्रयत्न असल्यामुळे यावेळी यात्रेच्या स्वरूपात थोडा बदल करण्यात येणार आहे.
इशान्येकडच्या १९ जागा
यात्रेच्या माध्यमातून इशान्य भारतातील चार राज्यांवर विशेष फोकस ठेवला जाणार आहे. या राज्यांतून १९ खासदार लोकसभेवर निवडून जातात. २०१९ च्या निवडणुकीत या जागांपैकी केवळ चार जागा कॉंग्रेसला मिळाल्या होत्या आणि ११ जागांवर पक्ष दुसऱ्या क्रमांकावर होता.
मणिपूर, मेघालय, नागालँड आणि आसाम ही ती राज्ये असून यंदा तेथे चांगली कामगिरी होण्याचा कॉंग्रेसला विश्वास आहे. आसाममधील ९ जागांवर कॉंग्रेस गेल्या वेळी दुसऱ्या क्रमांकावर होती. यातील तीन जागांवर तर पक्षाचे उमेदवार १ लाखापेक्षाही कमी फरकाने पराभूत झाले होते.
बंगालकडेही लक्ष
आसाम, मेघालय केल्यानंतर यात्रा कूचबिहार मार्गे प. बंगालमध्ये प्रवेश करेल. बंगालमधील किमान ८ जिल्हे यात्रेत कव्हर केली जाणार आहेत. २०१९ मध्ये मालदा आणि मुर्शिदाबाद येथे कॉंग्रेसची कामगिरी चांगली झाली होती. यंदा कॉंग्रेसची तृणमूल कॉंग्रेससोबत आघाडी आहे. २००९ मध्येही त्यांनी एकत्रित निवडणूक लढवली होती. २००९ मध्ये कॉंग्रेसला या राज्यात ६ जागा मिळाल्या होत्या. ते ध्यानात घेत यंदाही तोच मार्ग यात्रेचा असणार आहे.
बंगालनंतर ओडिशा, छत्तीसगढ, झारखंड प्रवास करत यात्रा बिहारमध्ये दाखल होईल. त्यानंतर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरात असा प्रवास असणार आहे. शेवटच्या टप्प्यात म्हणजे मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात यात्रा महाराष्ट्रात दाखल होईल आणि मुंबई हा अंतिम टप्पा असेल. २००९ मध्ये मुंबईत जिंकलेल्या जागांवर कॉंग्रेसची नजर असणार आहे.
२००९ मध्ये पक्षाने मुंबईतील ६ पैकी ५ जागा जिंकल्या होत्या तर एका जागेवर सहयोगी पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवार विजयी झाला होता. मात्र २०१९ च्या निवडणुकीती मुंबईतील ३ जागा शिवसेनेने तर ३ जागा भारतीय जनता पार्टीने जिंकल्या होत्या. २००९ च्या कामगिरीची पुनरावृत्ती करायची आणि इंडिया आघाडीत आपली दावेदार अधिक मजबूत करायची असे ध्येय कॉंग्रेसने ठेवले आहे.