उरूळी कांचन परिसरात शेतकरी चिंताग्रस्त
उरुळी कांचन- उरुळी कांचन परिसरात मोठ्या प्रमाणात परतीचा पाऊस झाल्याने हातातोंडाशी आलेली पिके पिवळी पडू लागली आहेत. त्यामुळे शेतकरी पुन्हा चिंताग्रस्त झाला आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्याचं दिवाळ निघणार काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पूर्व हवेलीत उरुळी कांचन, शिंदवणे, वळती, टिळेकरवाडी, खामगाव, भवरापूर, कोरेगाव मूळ या गावांसह परिसरात मोठ्या प्रमाणात पिके चांगली आली होती.
चांगला बाजारभाव असल्याने शेतकऱ्याने मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली आहे. तसेच शेतकऱ्यांनी टोमॅटो, वांगी आदी तरकारी पिकांची लागवड केली आहे. या पावसाने कांद्याची रोपे जाग्यावर सडून गेली आहेत. टोमॅटो वांगीच्या फुलांची मोठ्या गळती झाली आहे. काही ठिकाणी पाण्यामुळे पिके पिवळी पडू लागली आहेत. अगोदर कर्जमाफीचे पैसे न मिळाल्याने शेतकरी नाराज झाला आहे. त्यातच पुन्हा परतीचा प्रवास शेतकऱ्यांच्या हातातोंडचा घास हिरावून नेण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी ऐन दिवाळीच्या तोंडावर चिंताग्रस्त झाला आहे.