नवी दिल्ली – वर्ष 2022 संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. अशा परिस्थितीत जाणून घेऊया या वर्षातील काही वादग्रस्त प्रकरणांबद्दल, ज्यांनी सर्वसामान्य माणसांची झोप उडवली होती.
पंतप्रधानांच्या सुरक्षेत त्रुटी
5 जानेवारी रोजी शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यातील उड्डाणपुलावर त्यांचा ताफा अडकल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रसिद्धीच्या झोतात आले. ज्या ठिकाणी ही घटना घडली तेथून पाकिस्तानची सीमा केवळ 20 किलोमीटर अंतरावर होती. अशा परिस्थितीत मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे आपला दौरा अर्धवट सोडून मोदींना दिल्लीला परतावे लागले होते.
हिजाब विवाद
ऑक्टोबर 2021 मध्ये सुरू झालेला कर्नाटकातील हिजाबचा वाद यावर्षी जानेवारीतही पेटला. या प्रकरणी निर्णय आला तेव्हा सर्वोच्च न्यायालयातील दोन न्यायाधीशांचे मतही विभागले गेले. आता हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे आहे. कर्नाटकातील एका शाळेमध्ये शाळेचा गणवेश न घालता हिजाब परिधान केल्याने शाळा व्यवस्थापनाने संबंधित मुलीवर कारवाई केल्याने हा वाद पेटला होता.
नुपूर शर्मा वाद
भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा या वर्षी खूप चर्चेत होत्या. एका टीव्ही चर्चेदरम्यान पैगंबर मोहम्मद यांच्याबाबत वादग्रस्त टिप्पणी त्यांनी केली होती. त्यानंतर देशातील अनेक भागात हिंसाचार झाला. शर्मा अचानकपणे मुस्लिम संघटना आणि कट्टरतावाद्यांच्या निशाण्यावर आल्या. यानंतर नुपूर यांना राजीनामा द्यावा लागला, भाजपने त्यांना पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबित केले आहे.
अग्निपथ योजना
जूनमध्ये अग्निपथ योजना चर्चेत होती. यादरम्यान भारत सरकारने सुरू केलेल्या अग्निपथ योजनेला विरोध करण्यात आला. आंदोलकांनी या काळात अनेक गाड्या जाळल्या, त्यामुळे रेल्वे नेटवर्कवर परिणाम झाला. अग्निपथ योजनेद्वारे सरकार तरुणांच्या शैक्षणिक करीअरशी खेळ करत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला होता.
काश्मीर फाइल्स चित्रपट वाद
“द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट 11 मार्च रोजी प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर देशभरात प्रचंड गदारोळ झाला होता. या चित्रपटाला अपप्रचाराचे वर्णन करून चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.
पॉवर चेंज
या वर्षी महाराष्ट्र आणि बिहारमध्ये सरकार बदलले. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचे सरकार गेले आणि एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले. दुसरीकडे, बिहारमध्ये नितीश कुमार यांनी आरजेडीसोबत महाआघाडीचे सरकार स्थापन केले आणि भाजपशी फारकत घेतली.
सावरकर वाद
कॉंग्रेस नेते राहूल गांधी यांच्या शांततेने चाललेल्या “भारत जोडो’ यात्रेच्या महाराष्ट्रातील वाटचलीत राहूल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पुन्हा एकदा माफीवीर म्हटल्याने जुना वाद नव्याने उफाळून आला. कॉंग्रेसला असलेले सावरकरांचे वावडे आणि अन्य नेत्यांचे योगदान याविषयी पुन्हा एकदा वाद झडले.
श्रद्धा खून प्रकरण
श्रद्धा हत्याकांडाने संपूर्ण देशाला हादरवून सोडले. श्रद्धाचा प्रियकर आफताब याने दिल्लीतील मेहरौली येथे तिची गळा आवळून हत्या केली. यानंतर आफताबने मृतदेहाचे तुकडे केले आणि जंगलात फेकून दिले. सध्या आफताब तिहार तुरुंगात आहे.