अहमदनगर – जामखेडमध्ये भाजप नगरसेवकांना राष्ट्रवादीत सामील करून घेत नगरपालिकेतील सत्तेच्या चाव्या हाती घेतल्याची घटना ताजी असतानाच आज बारामतीतून असाच एक झटका शिवसेनेला देखील देण्यात आलाय.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, राज्यात महविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र येण्यापूर्वीच पारनेर नगरपंचायतीत शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसने जवळीक साधत सत्ता स्थापन केली होती. मात्र राष्टवादी सोबतची ही मैत्री आता शिवसेनेलाच भोवल्याचं दिसतंय. पारनेरच्या पाच शिवसेना नगरसेवकांनी मनगटावरील शिवबंधनाला जय महाराष्ट्र म्हणत मनगटावर राष्ट्रवादीचं घड्याळ बांधलंय.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बारामती येथे शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेल्या नगरसेवकांची नावे डॉ. मुद्दस्सीर सय्यद, नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, वैशाली औटी, नंदा देशमाने अशी असून याखेरीज शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनीही प्रवेश केला.
शिवसेनेच्या नगर सेवकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने आमदार पारनेर शहरात राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांचे वर्चस्व वाढले असून शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी यांना मोठा धक्का मानला जात आहे.
नगरसेवकांच्या शिवसेना सोडण्यामागचे कारण नागराध्यक्षांवरील नाराजी असल्याचं सांगण्यात येत असलं तरी ही निलेश लंके यांची आगामी नगरपंचायत निवडणुकीसाठीची खेळी असल्याचं म्हंटल जातंय.