नायगाव -लॉकडाऊनचा कालावधी वाढला असून पुणे, मुंबईमधील स्थिती बिकट आहे. यामुळे पुरंदर तालुक्यातील सीताफळ उत्पादकांचा जीव टांगणीला लागला आहे. ही सीताफळे देशभरात प्रसिद्ध आहेत. पुरंदरच्या अर्थकारणातील महत्त्वाचा घटक असलेल्या सीताफळ उत्पादकांना जुनच्या सुरूवातीलाच फटका बसण्याची चिन्हे दिसत आहेत. या शेतीतून दरवर्षी 10 ते 15 कोटी रुपयांची उलाढाल होते. मात्र, यंदा उत्पादकांची वाट बिकट झाली आहे.
पुरंदर तालुका अंजीर आणि सीताफळ उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. तालुक्यात सरासरी 12 हजार एकर क्षेत्रांमध्ये सीताफळाचे उत्पादन घेतले जाते. उन्हाळी आणि पावसाळी, असे दोन बहार शेतकरी घेतात. हा माल सासवड, पुणे, मुंबई, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, दिल्ली या राज्यासह अन्य भागात विक्रीसाठी जातो. यंदा मार्चपासून सीताफळ उत्पादक शेतकरी भरडला जात आहे. त्यात पुणे, मुंबई येथील बाजारपेठेची अवस्था तोळामासा झाली आहे. जून ते डिसेंबर या कालावधीत उत्पादित मालाची बाजारपेठच लॉकडाऊनच्या विळख्यातच सापडली आहे. बाजारभावाची शाश्वती उरली नाही. गेल्या वर्षी सीताफळाला प्रति कॅरेट (20 किलो) 500 ते 2 हजार रुपये भाव मिळाला होता. यंदा हाच भाव मिळेल काय, याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.
यंदा लॉकडाऊनमुळे सीताफळाला बाजारपेठ कमी प्रमाणात उपलब्ध होणार आहे. वाहतूक बंद असल्यामुळे खरेदीसाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या रोडावणार आहे. दरवर्षी परदेशातील व्यापारी पुरंदर तालुक्यात येऊन सीताफळाची खरेदी करतात. मात्र, पुणे, मुंबईमधील लॉकडाऊनचा कालावधी वाढल्यास सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांना जूनच्या सुरूवातीलाच मोठा फटका बसणार आहे.
– संदीप खेसे,
सीताफळ उत्पादक शेतकरी, नायगाव.
खते, औषधांचा तुटवडा
सीताफळांची तोडणी जून महिन्यात होणार आहे. मात्र, मार्चपासून शेतकरी प्रतिकूल परिस्थितीत शेतीची कामे उरकत आहेत. लॉकडाऊनच्या काळात खते, औषधांची टंचाई जाणवत आहे. पाऊस जर वेळेत सुरू झाला तर खतांची आणखी टंचाई जाणवणार आहे. त्यासाठी आताच मेटाकुटीला आलेला शेतकरी भरडणार आहे. पावसावर सीताफळाची बाग फुलविणारे जिगरबाज शेतकरी तालुक्यात आहेत. त्यांनाही आर्थिक झळ सोसावी लागणार आहे.
कोट्यवधी रुपयांची बाजारपेठ खाईत लोटणार
पुरंदर तालुक्यात सरासरी 10 ते 12 हजार एकरांवर सीताफळाचे उत्पादन घेतले जाते. सुमारे 10 ते 15 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. सीताफळांपासून रबडीची निर्मिती मोठ्या प्रमाणात केली जाते. करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे हा व्यवसायही मोठ्या प्रमाणात धोक्यात आला आहे. त्यामुळे या पिकांवर अवलंबून असलेल्या पूरक घटकांना झळ बसली आहे. लॉकडाऊनचा कालावधी वाढल्यास कोट्यवधी रुपयांची बाजारपेठ निर्माण करणारा शेतकरी आर्थिक खाईत लोटणार आहे.