देहूगाव, (वार्ताहर) – तीर्थक्षेत्र देहूतील इंद्रायणी नदीपात्रामध्ये बुधवारी (दि. १३) मोठ्या प्रमाणात मासे मृत झाल्याचे आढळून आले आहे. विविध जातीच्या माशांसह महाशिर अर्थात देवमास्यांचे मृत्यू झाल्याने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. माशांचे मृत्यू घडल्याची माहिती मिळताच विविध पर्यावरण प्रेमी संस्थानी नदीकडे धाव घेतली.
देहूची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून मोठमोठे गृहप्रकल्पे उभे राहत आहेत. अर्धवट कामांमुळे येथील सोसायट्यांना पूर्णत्वाचा दाखला नसल्याचे उघडकीस आले आहे. येथील गृहप्रकल्पांचे दूषित व मैलामिश्रित सांडपाणी ओढ्यामार्फत नदीपात्रात मिसळत आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाणी दूषित होत आहे. सांडपाण्यामुळे जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाढली असून संपूर्ण नदीपात्र हिरवेगार झाले आहे. देहूतील तीन मोठे ओढे व नाल्यांचे दूषित पाणी इंद्रायणी नदीपात्रामध्ये मिसळत असून नदीपात्रालगत असणारे सांडपाणी वाहून नेणारे अनेक चेंबरही फुटल्यामुळे नदी दूषित होत आहे.
बीज सोहळा अर्थात जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा ३७५ वा वैकुंठगमन अमृत महोत्सव सोहळा दहा दिवसांवर येऊन ठेपला आहे. सोहळयासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक येत असतात. या सोहळ्यापूर्वी इंद्रायणी नदीपात्रात मृत झालेल्या माशांची माहिती मिळताच पर्यावरणावर काम करणाऱ्या विविध सामाजिक संस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.
विभागीय आयुक्त कार्यालयातील सोशल डेव्हलपरचे आरती डोळस, देहू नगरपंचायतीचे मुख्याधिकारी निवेदिता घार्गे, जीवित नदी फाउंडेशनचे प्रमुख शैलजा देशपांडे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. नमामी इंद्रायणीचे सोमनाथ मुसूडगे, नगरपंचायतीचे अधिकारी, कर्मचारी, विविध संस्थांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त कार्यालयाकडून आलेल्या कर्मचाऱ्यांनी नदीपात्रातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. या पाण्याचे नमुने तपासण्यात येऊन मासे मरण्याचे प्रमुख कारण शोधून काढणार आहे. नैसर्गिक पद्धतीने सांडपाण्याचे निचरा कसा करता येईल त्यावर वेगवेगळे उपाययोजना व प्रकल्प लवकरात लवकर राबवण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती विभागीय कार्यालयातील डोळस यांनी यावेळी दिली.
तीर्थक्षेत्र देहू येथे संत तुकोबांच्या दर्शनासाठी लाखो भाविक येत असतात. त्यांची गैरसोय होणार नाही याची जबाबदारी देहू संस्थानची आहे. इंद्रायणीचे पाणी कायम स्वरूपी स्वच्छ कसे राहील याबाबत ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. देहू संस्थान, देहू नगरपंचायत, लोकप्रतिनिधी आणि शासन यांनी या समस्यांकडे गांभीर्यपूर्वक पाहणे गरजेचे आहे. डॉ. सदानंद मोरे, श्री संत तुकाराम महाराजांची वंशज.
पालखी अथवा बीज सोहळा आला की प्रशासन नियोजन आढावा बैठका घेते. प्रत्येकवेळी दूषित पाण्याचा प्रश्न चर्चेला येतो. संत तुकाराम महाराज यांचा ३७५ वा वैकुंठगमन अमृत महोत्सव बीज सोहळा तोंडावर आला आहे. भाविक भक्त तीर्थ म्हणून इंद्रायणीचे पाणी प्राशन करतात. दूषित पाण्यामुळे आज माशांचा मृत्यूची घटना घडली आहे. सोहळ्यात एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का ? डॉ. विवेक मोरे, संत तुकाराम महाराज वंशज.