नवी दिल्ली – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी नुकताच महाराष्ट्राचा दोन दिवसीय दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी पुढील वाटचालीबद्दल त्यांनी चर्चा केली. मात्र आता ममतांनी शरद पवारांनाच धक्का दिला आहे.
ममता बॅनर्जी यांनी सध्या पश्चिम बंगालसोडून गोव्यावर देखील लक्ष केंद्रीत केलं आहे. यात त्यांना यशही येतय. इतर पक्षातील नेत्यांना घेऊन ममता टीएमसीचा विस्तार करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यातच आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार धक्का दिला आहे.
गोव्यातील राष्ट्रवादीच्या एकमेव आमदाराला ममता यांनी आपल्या पक्षात आणलं आहे. चर्चील अलेमाओ यांनी आज तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ममता यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवारांची भेट घेतली होती. त्यामुळे एकीकडे ऐक्यसाठी प्रयत्न आणि दुसरीकडे मित्र पक्षांनाच दणका असं धोरण ममता यांनी स्वीकारल्याचं सध्या तरी गोव्यात दिसत आहे.
याआधी ममता यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतली होती. मात्र त्यानंतर काही दिवसांतच त्यांनी काँग्रेसविरुद्ध मोहिम सुरू केली. महाराष्ट्र दौऱ्यातही त्यांनी काँग्रेसलाच लक्ष्य केलं होतं.