परवा एका मित्राच्या घरी गेलो होतो. आमच्या गप्पा सुरू होत्या. त्याने नुकताच लॉन्च झालेला एक महागडा मोबाइल खरेदी केला होता. त्या मोबाइलमधील फीचर्स बद्दल तो मला अगदी भरभरून सांगत होता. आम्ही कॉलेजला असताना तो नेहमी नवनवीन मोबाइल खरेदी करीत असे. मोबाइल 3-4 महिने वापरायचा मग तो विकायचा आणि नवीन घ्यायचा अशी त्याची सवय होती. कॉलेज संपून नऊ वर्षे उलटली पण त्याचा स्वभाव मात्र तसाच होता. मी सहजच त्याला विचारले, काय रे हा कितवा मोबाइल असेल तुझा?
तो हसत म्हणाला, मोजले नाही पण अर्धशतक नक्कीच झाले असणार.
मग मी त्याला विचारले, तू सतत मोबाइल का बदलतो.
मोठ्या आवेशात तो बोलला, मी ट्रेंड सोबत जातो, जेजे नवीन आहे ते खरेदी करणे मला आवडते.
मी त्याला पुन्हा विचारले, मग आता किती मोबाइल तुझ्या जवळ आहेत?
त्यावर तो बोलला, हा एकच आहे, मी सहसा ठेवत नाही लगेच विकून टाकतो… अरे थांब बरं झालं तू असे अर्धवट वाक्य बोलून तो ताडकन उठला आणि कपाटाच्या दिशेने गेला. त्याने कपाट उघडले आणि त्यात शोधाशोध करून त्यातून एक मोबाइल बाहेर काढला. हातांच्या बोटाएवढा आणि वर अँटीना असणारा तो जुन्या काळातील फोन होता.
मोठ्या उत्साहाने त्याने तो फोन माझ्या हाती दिला आणि म्हणाला, हे बघ हा एक फोन आहे अजून.
मी म्हटलं, अरे हा तर फार जुना आहे, आणि तू तर म्हणाला मी ट्रेंड सोबत जातो. मग हा का नाही विकला?
यावर नरमाईच्या सुरत तो बोलला, अरे हा तर माझा पहिला फोन आहे ना… तो कसा मी विकेल? पुढे आमचा संवाद तसाच चालू राहिला. परंतु मनात एक गोष्ट येऊन गेली की,आयुष्यात कोणतीही पहिली गोष्ट किती महत्त्वाची असते ना!
पहिली गाडी, पहिले घर, पहिला पगार, पहिली नोकरी, पहिला टीव्ही अशा अनेक पहिल्या गोष्टी मनामध्ये एक वेगळी जागा करून ठेवतात. किंबहुना आपण त्या गोष्टींसाठी मनाचा एक कप्पा रिकामा ठेवत असतो. याला कुणी छंद म्हणतात तर कुणी आवड म्हणतात. परंतु खरं सांगायचं तर आयुष्यातील प्रत्येक पहिली गोष्ट एक विलक्षण आनंददायी आठवण देत असते. आता शुल्लक वाटणारी परंतु त्याकाळी लाखमोलाची वाटणारी अशी ती पहिली वस्तू किंवा गोष्ट. बऱ्याच वर्षांनंतर त्याची व्यवहारातील किंमत कितीही कमी झाली असेल तरी मनाने मात्र लाखमोलाचा भाव दिलेला असतो. आयुष्यात या पहिल्यावहिल्या आठवणींना अतिशय महत्त्व असते. लहानपणीचा पहिला फोटो, पहिले पाऊल, पहिले बोबडे शब्द आपण कौतुकाने मनात आणि कॅमेऱ्यात जतन करून ठेवतो. कारण अनेक वर्षांनी या जुन्या आठवणी एक सुखद अनुभव देऊन जातात.
अलीकडेच 2019 मध्ये भारतातील तामिळनाडूच्या के. गुकेश हा 12 वर्षीय तरुण बुद्धिबळात ग्रॅंडमास्टर झाला. अधिक वाचले असता लक्षात आले की के. गुकेश हा भारताचा 60 वा ग्रॅंडमास्टर आहे. आता मात्र आश्चर्याचा धक्का बसला. कारण भारतात 60 ग्रॅंडमास्टर होतात आणि आम्हाला बुद्धिबळ खेळ म्हटले की लक्षात राहतो तो केवळ विश्वनाथन आनंद. असे का असावे? कारण विश्वनाथन आनंद हा भारताचा पहिला बुद्धिबळ ग्रॅंडमास्टर आहे. यातील पहिला या शब्दाला खूप मोठे वलय आहे.
सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात प्रगतीचा वेग वाढत चालला आहे. यात अंतराळात जाऊन संशोधन करणारे अनेक अंतराळवीर आहेत; परंतु भारतातले पहिले अंतराळवीर म्हणून राकेश शर्मा यांचे नाव लक्षात राहते. पहिली महिला अंतराळवीर म्हटली की कल्पना चावला यांचे नाव तोंडात असते. कला, क्रीडा, अर्थ, सामाजिक, राजकीय आणि सर्वच क्षेत्रांतील पहिली नवे आपणाला परिचित असतात.
यशाच्या आणि वलयाच्या खुर्चीवर विराजमान होणारे अनेक असतात. परंतु पहिल्यांदा त्या क्षेत्रात उतरून नेत्रदीपक यश मिळवणारे कायम स्मरणात राहतात. मुळात हे पहिलेपण मिळविणे ही खूप अभिमानाची गोष्ट असते. मात्र त्यासाठी त्यामागे अनेक गोष्टीही असतात. पूर्वापारपासून चालत आलेल्या चाकोरीबद्ध जीवनातून बाहेर पडून काहीतरी वेगळे करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती त्यात असते. आळसावर मत करून सातत्याने झटण्याची ऊर्जा त्यात असते. इतरांपेक्षा काहीतरी वेगळे आणि भव्यदिव्य करण्याचा अट्टाहास त्यात असतो. जे करायचे ते करणारे आपण पहिले असू असा आगळावेगळा अट्टाहास त्यात असतो. मग ते काहीही असो. अगदी पहिली भेट, पहिला निर्णय, पहिले अपयश, पहिले यश अशा अनेक गोष्टी त्यात येतात. आपली पहिली प्रतिमा, पहिले इम्प्रेशन हे आपल्यातील नैपुण्य दर्शवित असते. म्हणूनच पहिले हा शब्द आपल्याला पहिला प्राधान्याने घ्यायला हवा. काहीतरी वेगळे आणि इतरांना आदर्शस्थानी ठरेल अशी आगळीवेगळी कृती करण्यासाठी आपण कल्पक असायला हवे. फर्स्ट इम्प्रेशनमध्येच आपल्यातील सकारात्मकता आणि आत्मविश्वास लोकांना देता आला पाहिजे. चला तर मग फर्स्ट क्लास राहून फर्स्ट इम्प्रेशनसाठी जरा हटके विचार करूया.
सागर ननावरे