नगर – गुलमोहर रस्त्यावरील पारिजात चौकात लागलेल्या आगीत अनधिकृत पत्राशेडमधील चार दुकाने जाळून खाक झाली. या घटनेत सुमारे सात ते आठ लाख रुपयांचे नुकसान झाले. गाळ्याजवळच टायर पेटवल्यामुळे ही आग लागण्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, या आगीमुळे अनधिकृत पत्राशेडचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. आमदार संग्राम जगताप यांनी महापालिकेवर टीका करीत या घटनेला अनधिकृत गाळ्यावर कारवाई न करणारे आयुक्तच जबाबदार असल्याचा आरोप केला. त्यानंतर स्वतः आयुक्त पंकज जावळे यांनी घटनास्थळी भेट देऊन जळालेल्या दुकानांसह तेथील सर्व अनधिकृत पत्र्यांचे गाळे हटवण्याचे आदेश दिले आहेत.
शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कुलर, फर्निचर, कुशनच्या चार दुकानांना मागील बाजूने आग लागली. अवघ्या काही सेकंदात आगीने रौद्ररूप धारण केले. महापालिकेच्या अग्निशमन विभागास घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान व विभाग प्रमुख शंकर मिसाळ दोन गाड्यांसह घटनास्थळी दाखल झाले. माजी नगरसेवक निखिल वारे, अजिंक्य बोरकर यांच्यासह सहकाऱ्यांनी अग्निशामक दलाच्या जवानांसमवेत आग विझविण्याचे प्रयत्न केले. तब्बल दोन तासांनंतर आग आटोक्यात आली.
आमदार संग्राम जगताप यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अनधिकृतपणे उभारलेल्या या पत्र्याच्या शेडबाबत यापूर्वीच महापालिकेने कारवाई करणे अपेक्षित होते. अनेक जागामालक मनपाची परवानगी न घेता नियमबाह्य गाळे बांधतात. छोटे व्यावसायिक रोजीरोटीसाठी हे गाळे भाड्याने घेतात. मात्र, अशा घटना घडल्यावर यात या गाळेधारकांचेच नुकसान होते. यापूर्वीही तपोवन रस्त्यावर अशीच घटना घडली.
मनपाने वेळीच दखल घेऊन कारवाई केली असती, तर हे लाखो रुपयांचे नुकसान टळले असते. याला महापालिका प्रशासन व त्याचे प्रमुख आयुक्त हेच जबाबदार आहेत, असा आरोप आमदार जगताप यांनी केला. दरम्यान, जगताप यांच्या आरोपानंतर आयुक्त जावळे यांनी घटनास्थळी भेट दिली. आग लागलेल्या दुकानांसह तेथील सर्व अनधिकृत गाळे हटवण्याचे आदेश आयुक्तांनी संबंधित विभागाला दिले आहेत