पिंपरी – डिझेल, टायर, ट्यूब यांच्या दरात होत असलेल्या वाढीमुळे वाहतूक व्यावसायिकांची चांगलीच आर्थिक कोंडी झाली आहे. त्यांच्या दैनंदिन वाहतूक खर्चात 20 टक्के वाढ झाल्याचा दावा वाहतूक व्यावसायिकांनी केला आहे. शहरातील सुमारे दोन हजार वाहतूक व्यावसायिकांना फटका बसत आहे.
21 मार्चपासून इंधनाचे दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या 10 दिवसांमध्ये नऊ वेळा दरवाढ झाली आहे. वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या ट्रकमध्ये मुख्यत्वे डिझेलचा वापर केला जातो. त्यामुळे डिझेल दरवाढीचा वाहतूकदारांना मोठा फटका बसतो.
इंधन दरवाढीमुळे अन्य वस्तूंचीही दरवाढ होते. सध्या मालवाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांचे टायर, ट्यूब यांचे दर वाढले आहेत. टोल आकारणी, मनुष्यबळावर होणारा खर्च, वाहनांच्या देखभाल-दुरुस्तीवरील खर्च आदींचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष परिणाम मालवाहतुकीवर होत आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच उपनगरांमध्ये दुधापासून ते भाजीपाल्यापर्यंत सर्व वस्तूंची वाहतूक अवजड वाहनातून होते. यात रस्तेमार्गे होणाऱ्या मालवाहतूक वाहनांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात 5 हजार तर एकट्या पिंपरी-चिंचवड शहरात
सुमारे 2 हजार मालवाहतूकदार आहेत.
मालवाहतूकदार झाले त्रस्त
इंधनाच्या दरात वाढ होत असल्याने मालवाहतूकदार त्रस्त झाले आहेत. करोना काळात अन्य सेवा ठप्प असताना मालवाहतूकदारांनी जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक अव्याहत सुरू ठेवली होती. त्याची केंद्र किंवा राज्य सरकारने दखल घेतली नाही. मासिक हप्ते आणि कर भरण्यासाठी धडपडणाऱ्या ट्रक चालकांसाठी ही इंधन दरवाढ जीवघेणी ठरू शकते. केंद्र सरकारने सवलतीच्या दरात मालवाहतूकदारांना डिझेल उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी त्यामुळे जोर पकडू लागली आहे.
इंधन दरवाढीमुळे मालवाहतूकदारांची आर्थिक कोंडी झाली आहे. या दरवाढीने वाहतूकदारांचे अतोनात नुकसान होत आहे. जीवनावश्यक वस्तूंसह आवश्यक सर्व मालाची वाहतूक मालवाहतूकदार करीत असतात. डिझेल दरवाढ, टोल आकारणी, टायर, ट्युबच्या दरात झालेली वाढ, मनुष्यबळावर होणारा खर्च यामुळे वाहतूकदार अडचणीत आहेत. पर्यायाने दैनंदिन वाहतूक खर्चात 20 टक्के वाढ झाली आहे. केंद्र व राज्य सरकारकडून त्याची दखल घेण्यात यावी.
– प्रमोद भावसार, अध्यक्ष,
असोसिएशन ऑफ ट्रॉन्सपोर्टर्स, पुणे.