कोलंबो – आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेला भारताकडून तब्बल पंधराशे मेट्रिक टनचा अन्नपुरवठा करण्यात आला आहे. यामध्ये 14,700 मेट्रिक टन (एमटी) तांदूळ, 250 मेट्रिक टन दूध पावडर आणि 38 मेट्रिक टन औषधांचा समावेश आहे.
श्रीलंका 1948 मध्ये स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात वाईट आर्थिक संकटाचा सामना करत आहे ज्यामुळे देशभरात अन्न, औषध, स्वयंपाकाचा गॅस आणि इंधन यासारख्या आवश्यक वस्तूंची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.
या बिकट परिस्थतीत भारताने शुक्रवारी श्रीलंकेला सुमारे 65 कोटी 35 लाखांहून अधिक किमतीचा अन्नपुरवठा पुरविला आहे. श्रीलंकेतील भारतीय उच्चायुक्त गोपाल बागले, श्रीलंकेचे आरोग्य मंत्री केहेलिया रामबुकवेला, व्यापार मंत्री नलिन फर्नांडो आणि संसद सदस्यांनी ही खेप स्वीकारली. येत्या काही दिवसांत श्रीलंका सरकारकडून लाभार्थ्यांमध्ये हे अन्नधान्य वितरित करण्यात येणार आहे.
परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांच्या नेतृत्वाखालील वरिष्ठ भारतीय अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने येथे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे आणि पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्यासह श्रीलंकेच्या सर्वोच्च नेतृत्वाची भेट घेतल्याच्या एका दिवसानंतर ही मदत सुपूर्द करण्यात आली. यापूर्वी भारताकडून 40,000 मेट्रिक टन तांदूळ, 500 मेट्रिक टन दूध पावडर आणि औषधांच्या मोठ्या साठा देण्यात आला होता.
दरम्यान, भारताने श्रीलंकेला गुंतवणूक, कनेक्टिव्हिटी आणि आर्थिक संबंधांना प्रोत्साहन देऊन आर्थिक पुनर्प्राप्तीसाठी मदत करण्यास तयारी दर्शविली आहे.