नवी दिल्ली – चेन्नई-अंदमानदरम्यान समुद्रात अंथरलेली फायबर लिंक सुरू झाली असून एअरटेलने अंदमान-निकोबारमध्ये 4- जी मोबाइल सेवा सुरू केल्या आहेत. त्यामुळे अंदमान-निकोबारला जाणारे पर्यटक आणि अंदमान निकोबारमधील रहिवाशांना हाय स्पीड इंटरनेट डेटा उपलब्ध होऊ शकणार आहे. यामुळे या भागातील लोकांचे जीवन आमूलाग्र बदलणार आहे, असे भारती एअरटेल कंपनीचे अध्यक्ष सुनील भारती मित्तल यांनी सांगितले.
या फायबर नेटवर्कचा वापर करून इतर मोबाइल कंपन्यांही अंदमान-निकोबारमध्ये 4-जी सेवा सुरू करू शकतील. या कंपन्यानी त्यासाठी तयारी केली आहे. त्याचबरोबर आगामी काळामध्ये 5-जी मोबाइल सेवा सुरू केल्या जाऊ शकतील. भारताच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातूनही अंदमान-निकोबारमध्ये वेगवान इंटरनेट सेवा असण्याची आवश्यकता होती. त्यामुळे भारत या क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यास मदत झाली असल्याचे पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज वरिष्ठ अधिकारी संदीप अग्रवाल यांनी सांगितले. यामुळे भारताची दक्षिण सीमा अधिक सुरक्षित होण्यास मदत होणार असून या क्षेत्रात उद्योग-व्यवसाय वाढतील आणि गुंतवणूक वाढेल असे समजले जाते.