पवनानगर – मावळ तालुक्यातून बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाला विरोध कायम मावळातील जनभावनेचा आदर करुन हा प्रकल्प रद्द करण्यासाठी शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरणार असल्याची चिन्हे दिसत आहे.
1 मे 2008 रोजी पवना बंद जलवाहिनीच्या कामाचे भूमिपूजन तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार यांनी केले होते. या प्रकल्पाला सुरुवातीच्या काळापासून मावळात विरोध राहिला. 9 ऑगस्ट 2011 क्रांतीदिनी आंदोलन झाले.
या आंदोलनात 3 शेतकऱ्यांचा बळी गेला आणि तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रकल्पाला स्थगिती दिली. हा प्रकल्प सुरुवातीपासून वादाच्या भवऱ्यात सापडला बंद जलवाहिनी न करता रावेत बंधाऱ्यापासून पिंपरी-चिंचवड महापालिकेने पाणी उचलून न्यावे, अशी मावळातील नागरिकांची भावना आहे.
परंतु पिंपरी-चिंचवड शहाराची वाढती लोकसंख्या पाहता जलवाहिनीसाठी महापालिका पुन्हा तयारीत आहे; परंतु एकूणच परिस्थिती पाहता पुन्हा एकदा जलवाहिनीच्या कामाला सुरुवात झाल्यास मावळातून तीव्र विरोध होणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका किंवा राज्य शासन यांनी आमच्या भूमिकेशी खेळ करण्याचा प्रयत्न केल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करून जशाच तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी दिला आहे.
शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेश खांडभोर म्हणाले की, पवना बंदिस्त जलवाहिनीबाबत मावळ शिवसेनेची भूमिका पहिल्यापासून कायम असून शिवसेना नेहमी शेतकऱ्यांसोबत राहिली आहे. पिंपरी-चिंचवडला पाणी देण्यास आमचा विरोध नसून, बंदिस्त जलवाहिनीतून पाणी देण्यास आमचा विरोध कायम आहे. जो निर्णय शेतकऱ्यांचा असेल तोच निर्णय शिवसेनेचा असेल.
जलवाहिनी विरोधात आंदोलन करुन भाजप, शिवसेना, कॉंग्रेस, आरपीआय, मनसे यांनी विरोध केला होता. आमदार सुनील शेळके यांनी 9 ऑगस्टला गोळीबारातील मृतांना श्रध्दांजली वाहण्यासाठी गेले असता शेतकऱ्यांच्या सोबत असल्याचे सांगितले, यामुळे जलवाहिनीच्या निमित्ताने पुन्हा एकदा पवनेचे पाणी पेटणार आहे.