मदन भोसले यांचे आ. मकरंद पाटील यांना प्रत्युत्तर
चिखली येथे उज्ज्वला योजनेंतर्गत गॅसचे वितरण
मेणवली – शेतकरी सभासदांनी जेव्हा किसनवीर कारखान्याची जबाबदारी आमच्यावर सोपवली त्यावेळी विरोधकांच्या निष्क्रियतेमुळे कारखान्याची अवस्था अतिशय दयनीय झाली होती. कारखाना बंद पडतो की काय अशी वेळ या मंडळींनी आणली होती. मात्र कारखान्याच्या कारभारात स्वत:ला झोकून देत गेल्या काही वर्षांमध्ये कारखान्याची चौफेर प्रगती केली. आज किसन वीर साखर कारखान्याचा कारभार इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
मात्र त्यामुळे मतदारसंघात जादा संपर्क ठेवता आला नाही. त्याचा लाभ उठवून आमदारकी भूषवणाऱ्यांनी गेल्या दहा वर्षात काय दिवे लावले? कारखान्याची साखर जाळली, चोरली असे आरोप असणाऱ्यांनी सभासद आणि कामगारांच्या पैशाची अजिबात चिंता करू नये, अशा खरपूस शब्दात माजी आमदार मदन भोसले यांनी आमदार मकरंद पाटील यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. दरम्यान, शेतकरी सभासद आणि कामगारांच्या हिताबरोबरच संपूर्ण मतदारसंघात पुन्हा विकासाचा झंझावात निर्माण करण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केला असून अवघ्या पाच-सहा महिन्यात मतदारसंघासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करून आणल्याची माहिती मदन भोसले यांनी दिली. चिखली, ता. वाई येथे पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी ज्येष्ठ नेते बापूसाहेब शिंदे, भाजपाचे वाई तालुकाध्यक्ष सचिन घाटगे, संघटक यशवंत लेले, अशोक वाडकर, वाई तालुका भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस ब्रह्मदेव वाडकर, ओबीसी सेलचे अध्यक्ष रामचंद्र वीरकर, रोहिदास पिसाळ, दिलीप वाडकर, चंद्रकांत शेलार, चिखली गावच्या सरपंच योगिता यादव, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. यावेळी 105 महिलांना मदन भोसले यांच्या हस्ते गॅसचे वितरण करण्यात आले. मदन भोसले म्हणाले, कारखान्याचा कारभार सुधारण्यासाठी काम करत असताना मतदारसंघातील जनतेसाठी वेळ देता आला नाही यांची खंत वाटते. परंतु शेतकरी हितासाठी आमदारकी पणाला लावली.
गेल्या दहा वर्षांत वाई-खंडाळा-महाबळेश्वर मतदारसंघात ढवळाढवळ केली नाही. विद्यमान आमदारांच्या कामगिरीवर लक्ष ठेवून होतो. विकासाची दूरदृष्टी नसल्याने विकासकामांच्या बाबतीत मात्र ते सपशेल अपयशी ठरले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाने प्रभावित होऊन मतदारसंघाचा नव्याने विकास करण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या एक-दोन बैठकांमध्येच मतदारसंघासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून आणण्यात यशस्वी झालो आहे. केवळ वैयक्तिक कार्यक्रमात हजेरी लावून विकास होत नसतो.
आमदारांच्या निष्क्रियतेमुळे विकास होण्याऐवजी मतदारसंघ भकास झाला आहे. भाजप सरकारच्या लोकहिताच्या योजना मतदारसंघात पोहचवून पुन्हा विकासाचे नवे पर्व उभे करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. वाईच्या पश्चिम भागात आजपर्यंत 2500 गॅसचे वितरण करण्यात आल्याची माहिती अशोक वाडकर यांनी दिली. सचिन घाटगे यांनी आपल्या मनोगतात भाजप सरकारच्यावतीने लोकहितासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली. यावेळी ग्रामपंचायती च्यावतीने ओबीसी बांधवांना भांड्यांचे वाटप करण्यात आले. ब्रह्मदेव वाडकर यांनी प्रास्तविक व आभार मानले. यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.