सोरतापवाडी, (वार्ताहर) – शेतमालाला बाजारभाव असेल तर तेजीचे वातावरण असते; परंतु गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून शेतमालाला बाजारभाव नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. घेतलेले पीककर्जाचे रक्कम मार्चमध्ये भरावयाचे कशी, असा प्रश्न शेतकर्यांच्या पुढे उभा राहिला आहे.
घरखर्च, मुलामुलींच्या शिक्षणाचा खर्च व परत शेती उभी करण्यासाठी भांडवल आणायचे कोठून? या विवंचनेत शेतकरी आहेत. शेतीवर अवलंबून असणार्या शेतमजूरांची अवस्थाही बिकट आहे. त्यांच्याही हाताला काम नाही. त्यामुळे त्यांंचाही उदरनिर्वाह चालणे मुश्कील झाले आहे. कोणत्याही व्यवसायात तेजीचे वातावरण नाही.
यामुळे सामान्य माणसाला चरितार्थ चालवणे कठीण होऊन बसले आहे. एरवी, कांदा, पालेभाज्या, फळभाज्या, फळे, यांची भाववाढ झाली की आंदोलन करणारे पेट्रोल, डीझेल, सीएनजी, स्वयंपाकाचा गॅस, खाद्यतेलाच्या किंमती वाढल्या तरी आता गप्प का, असा प्रश्न शेतकरी विचारु लागलेत. कोणाला काही देणे घेणे नाही त्यावर कोणीही आवाज उठवत नाही. अशीच अवस्था आहे.
पेट्रोल, डीझेलने जवळपास शंभरीपार केली आहे. तर भाजीपाला शेतकर्यांकडून खरेदी करताना दोन रुपये गड्डी पण खरेदी केली जात नाही. थंडी संपत आली असून सकाळी थोडी थंडी वाजते पण दुपारी कडक उन्हाळा जाणवू लागला आहे. तसेच नवीन मुळामुठा कालवा बंद असल्याने पाणी टंचाई जाणवू लागली असून थोडया पाण्यात शेती करणे अवघड होत आहे. शासनाने योग्य निर्णय घेऊन शेतकर्यांना दिलासा द्यावा. -दत्तात्रय चौधरी, शेतकरी पेठ