बीड : करोनामुळे अनेक गोष्टींवर परिणाम झाला आहे. या चक्रातून शेतकरी देखील सुटलेला नाही. बीड जिल्ह्यातील बॅंकांमध्ये 31 तारखेपर्यंत केवळ कर्जाचा हप्ता भरणे आणि कर्ज मंजूर करणे या दोनच बाबींवरती काम होणार आहे.
इतर कोणतेही काम 31 तारखेपर्यंत बॅंकांनी करू नये, असे स्पष्ट निर्देश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे बीड जिल्ह्यातील सगळे आधार सेंटर 31 तारखेपर्यंत बंद राहणार आहेत.
ज्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणखी झाली नाही अथवा त्यासंदर्भात काही काम बाकी असले तर ते काम 31 तारखेनंतर होईल, असे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे करोनाचा फटका आता शेतकरी कर्जमाफीला देखील बसणार असल्याची चिन्हे आहेत.
करोनाला प्रतिबंध घालण्यासाठी बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी एक नियमावली तयार केली आहे. यापूर्वीच बीड जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला आहे. त्या अंतर्गत एक नियमावलीचा परिपत्रक जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे.
विशेष म्हणजे बीड जिल्ह्यातील बॅंकांमध्ये 31 तारखेपर्यंत केवळ कर्जाचा हप्ता भरणे आणि कर्ज मंजूर करणे या दोनच बाबींवरती काम होणार आहे. इतर कोणतेही काम 31 तारखेपर्यंत बॅंकांनी करू नये, असे स्पष्ट निर्देश राहुल रेखावार यांनी काढलेल्या परिपत्रकामधून देण्यात आले आहे.
यासोबतच जिल्ह्यातील सगळ्या एटीएमची स्वच्छता ही दर तासाला करणे बंधनकारक राहील अशाही सूचना देण्यात आले आहेत.
दरम्यान, बीड जिल्ह्यातील आठवडे बाजार 31 तारखेपर्यंत बंद असणार आहेत. प्रत्येक क्षेत्रातील संबंधित अधिकाऱ्याकडे यादरम्यान लक्ष ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. करोना रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी घालून दिलेल्या कामामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्यावर फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशाराही पत्रकात देण्यात आला आहे.