गुंतवणूकदरांचे 7.62 लाख कोटीचे नुकसान
मुंबई : जागतिक मंदी आणि करोना व्हायरस मुळे भारतीय शेअर बाजाराचे अतोनात नुकसान चालूच आहे. सोमवारीही शेअर बाजार निर्देशांकात मोठी घट झाली.
मात्र रिझर्व बॅंकेने परिस्थितीकडे बारीक लक्ष असल्याचे सांगितले व योग्य वेळी योग्य उपायोजना करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. सोमवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 2713 अंकांनी कोसळून 31 हजार 390 अंकांवर बंद झाला.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 757 अंकांनी कोसळून 9 हजार 197 अंकावर बंद झाला. निर्देशांक एवढ्या मोठ्या प्रमाणात कमी झाल्यामुळे आज एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे 7.62 लाख कोटी रुपयाचे नुकसान झाले.
गेल्या एक महिन्यापासून जागतीक मंदी आणि करोना व्हायरसमुळे जागतीक शेअर बाजाराबरोबरच भारतीय शेअर बाजार निर्देशांकाचे मोठे नुकसान झाले आहे.
रिझर्व बॅंक योग्यवेळी हस्तक्षेप करणार
रिझर्व बॅंकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी करोना व्हायरसचा विमान वाहतूक कंपन्या, पर्यटन आणि आदरातिथ्य कंपन्यावर परिणाम होत असल्याची जाणीव रिझर्व बॅंकेला असल्याचे त्यानी सांगितले.
यासाठी रिझर्व्ह बॅंक भांडवल सुलभता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे ते म्हणाले. मात्र व्याजदर कपातीचा निर्णय घेण्याचा अधिकार फक्त पतधोरण समितीला आहेत. पतधोरण समिती निर्णय 3 एप्रिल रोजी होणार आहे. आता त्याच दिवशी व्याजदरात कपात होण्याची शक्यता असल्याचे समजले जाऊ लागले आहे.