पेठ -सातगाव पठार (ता. आंबेगाव) भागातील थुगाव येथे शुक्रवारी (दि. 17) सायंकाळी पाचच्या दरम्यान अचानक झालेल्या वादळाने अनेक शेतकऱ्यांच्या घरांचे, पोल्ट्रीचे पत्रे उडाले, तर ज्वारीच्या कडब्याच्या रचलेल्या वळई उडून जाऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
थुगाव येथे शुक्रवारी (दि. 17) सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पोलीस पाटील प्रवीण रामचंद्र एरंडे यांच्या घराचे आणि पोल्ट्रीचे सर्व पत्रे उडून गेले आहेत.
भिंतींना तडे गेले आहेत आणि पाण्याच्या टाक्या फुटल्या आहेत.गोपाळ भिकाजी एरंडे यांच्या घराचे निम्मे पत्रे उडून गेले, तर उर्वरित पत्रे फुटले आहेत. त्यांची कडब्याची वळई वाऱ्याने उडाली आहे.
गाव कामगार तलाठी हेमंत भागवत यांनी नुकसानीचा पंचनामा केला असून, एरंडे यांचे 3 लाख 20 हजार आणि गोपाळ एरंडे यांचे अंदाजे 1 लाख 40 हजारांचे नुकसान झाले आहे.