छत्रपती संभाजीनगर – काबाडकष्ट करून, तळहाताच्या फोडोप्रमाणे जपून शेतकरी राजाने आपल्या वावरात “पांढरं सोनं’ पिकवले. असे असले तरी या कापसाला यंदा अपेक्षित असणारा भावच न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या घरात सध्या तो पडून असल्याचे चित्र आहे.
जून महिन्याच्या अखेरीस पडत्या भावात शेतकऱ्यांवर कापूस विकण्याची वेळ आली होती. तर अनेक शेतकऱ्यांनी क्विंटलमागे साडेसहा ते सात हजार रुपयांच्या भावाने कापूस विकला आहे. 17 जुलै रोजी कापूस खरेदी बंद होईल अशा सूचना मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी 15 जुलैपर्यंत कापूस बाजारात आणला होता. कापसाला 15 जुलै रोजी सात हजार दोनशे रुपये इतका भाव मिळाला.
पण अजूनही काही शेतकऱ्यांनी कापसाला भाव मिळेल या अपेक्षेने अजूनही कापूस घरातच ठेवला आहे. सोमवारी (17) जुलै रोजी सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कापसाचा मुद्दा मांडण्यात यावा अशी मागणी देखील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. तसेच शेतकऱ्यांची ही कापूस कोंडी विरोधक आक्रमकपणे शेतकऱ्यांसमोर मांडू शकले नाही तर सरकार देखील शेतकऱ्यांच्या शेतमालाल भाव देऊ शकणार नाही, अशी व्यथा शेतकऱ्यांनी बोलून दाखवली आहे. या वर्षी कापसाच्या भावात चढउतार होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आणखी भाव गडगडले तर.. अशीच चिंता शेतकऱ्यांना आहे.
मागील वर्षी पंधरा हजार भाव
मागील वर्षी कापसाला पंधरा हजारांपर्यंत भाव मिळाला होता. त्यामुळे यंदाही कापसाला तितकाच भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी ठेवली होती. भावातील चढउतारामुळे शेतकरी कापूस भाव वाढण्याची आशा बाळगून होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा कापूस अजूनही घरातच आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आता आर्थिक नुकसानाला देखील सामोरे जाव लोगणार असल्याचे चित्र आहे. आता बाजार बंद होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. मात्र शेतकऱ्यांना कापूस कसा आणि कोणत्या भावात विकायचा याच विलंचनेत असल्याचे चित्र आहे. कापसाला भाव मिळत नसल्याने याचा परिणाम वस्त्रोद्योगावर देखील होऊ शकतो. गिरण्यांमध्ये देखील कापूस गाठींचा साठा कमीच असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.