पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – मार्केट यार्डातील फळ विभागात शेतकर्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली. डमी आडत्या (चवली दलाल) मोसंबीला कमी भाव देतो, हे सांगितल्याने शेतकर्याला मारहाण करण्यात आली. त्यामुळे शेतकर्यांनी मार्केट यार्डात शेतमाल विक्रीसाठी पाठवायचा का नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी गावातील शेतकरी आदिनाथ गायकवाड यांनी शुक्रवारी एका आडत्याकडे १०८ क्रेट्स संत्री विक्रीस आणली होती. त्या शेतकर्याकडे संत्रीसह मोसंबीचीही बाग आहे. मोसंबीदेखील बाजारात विक्रीस आणायची होती. त्यामुळे मोसंबीला किती भाव मिळत आहे, याची चौकशी करायला गायकवाड हे एका आडत्याच्या गाळ्यावर गेले. तेथे ते चर्चा करत असताना त्यांच्या पाठीमागे एक डमी आडत्या उभा होता.
चर्चेवेळी शेतकरी गायकवाड यांनी डमीकडे मोसंबीला भाव कमी मिळतो, असे सांगितले. त्यावरून डमी आडत्याला राग अनावर झाला आणि त्याना शेतकर्याला लाथा, कानशिलात लगाविल्या. त्यानंतर शेतकरी गाकवाड हे घाबरले होते. रविवारी बाजारात आल्यानंतर त्यांनी ही घडलेली घटना पत्रकांरांसह आडते असोसिएशनच्या पदाधिकार्यांच्या कानावर घातली. मात्र, बाजारात शेतमाल विक्रीस पाठवायचा असल्याने पुढे अडचणी नको म्हणून तक्रार करण्यास शेतकरी घाबरला. बाजार समितीने मात्र याची काहीही दखल घेतलेली नाही.
याबाबत नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी गावातील शेतकरी आदिनाथ गायकवाड म्हणाले, गेल्या तीस वर्षांपासून मी मार्केट यार्डात शेतीमाल विक्रीस पाठवित आहे. मोसंबीचा भावाची चौकशी करताना आडत्यांना डमी आडत्याकडे शेतमालास कमी भाव मिळतो हे सांगितले. तेवढे ऐकून डमी आडत्याने मला लाथा मारल्या आणि कानशिलात लगावली.
याबाबत बाजार समितीचे सचिव डॉ. राजाराम धोंडकर म्हणाले, हा प्रकार दोन-तीन दिवसांपूर्वी घडला आहे. संबंधित शेतकर्याने या प्रकाराबाबत तक्रार केलेली नाही. मात्र, विभागप्रमुख यांना या प्रकाराची चौकशी करायला सांगितली आहे, तसेच संबंधित डमी आडत्याला मार्केटमध्ये प्रवेश न देण्याच्या सूचना केल्या आहेत.