चंदीगड – केंद्र सरकारच्या शेतीविषयक तीन विधेयकांच्या विरोधात पंजाब आणि हरियानात सुरू झालेले आंदोलन आजही सुरूच राहिले.
आज शेतकऱ्यांनी अमृतसर येथील रेल्वे मार्गावर आपल्या अंगातील शर्ट काढून ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे त्या भागातील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत त्यांनी ही विधेयके त्वरित मागे घेण्याची मागणी केली.
किसान मजदूर संघर्ष समिती मार्फत देवीदासपूर येथील रेल्वे मार्गावर हे आंदोलन करून रेल्वे वाहतूक बंद पाडण्यात आली. या भागातील शेतकरी गेले तीन दिवस हे आंदोलन करीत आहेत.
शेतकऱ्यांनी आपले हे रेल रोको आंदोलन आणखी तीन दिवस वाढवले असून त आता 29 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. केंद्र सरकारने एमएपसपी म्हणजेच किमान आधारभूत किंमत व्यवस्थेला कायदेशीर स्वरूप द्यावे, अशीही त्यांची मागणी आहे.