खोडद – लॉकडाऊनमुळे पुणे, मुंबईसारख्या मेट्रो शहरांमधील अनेक कुटुंबे गावगाड्यात दाखल झाली आहेत. ग्रामीण भागातील नागरिक घरात बसून आपल्या कुटुंबासोबत लॉकडाऊनचा पुरेपूर आनंद घेत आहेत. ही कुटुंबे गोतावळ्यात रमली आहेत. अनेकजण घरी विविध खाद्यपदार्थांची पाककृती करण्यात व्यस्त झाली आहेत. दोन पिढ्यांतील रुंदावललेली कौटुंबिक विश्वाससार्हतेची दरी करोनामुळे एकरूप झाली असल्याचा प्रत्यय जुन्नर तालुक्यात येत आहे.
एकत्र कुटुंब पद्धतीचा ऱ्हास झाला आहे. ग्रामीण भागातील अनेक कुटुंबे शहरीकरणाकडे धावली. ही कुटुंबे भौतिक सुविधांच्या छायेत विसावली. त्यांच्या दोन ते तीन पिढ्या शहरातच विस्तारल्या. एरव्ही पुणे, मुंबई, किंवा परदेशात कामानिमित्त गेलेल्या मुलांना आई बापाने काही कार्यानिमित्त गावी बोलाविले तरी लवकर आपल्या गावी न येणारे आता लॉकडाऊन जाहीर होताच आपापल्या गावी आले आहेत. त्यामुळे अनेक वर्षांपासून गावाकडील घरी एकत्र न आलेली कुटुंबेही आता मुले, मुली, सुना, नातवंडानी फुलून गेली आहेत. घरातील ज्येष्टांच्या चेहऱ्यांवर समाधानाची लकेर उमटली आहे.
संपूर्ण कुटुंब घरातच लॉकडाऊन झाल्यामुळे कोणालाही घराबाहेर पडता येत नाही. घरातच लेकरांसोबत पत्ते, बुद्धीबळ, कॅरम, चल्लसआठ आदी खेळ खेळण्यात दिवस निघून जात आहे, लॉकडाऊनमुळे भाजीपाला, दूध, फळे, आंबे, चिकन, मासे, मटण, भेळ, पाणीपुरी व घरपोच किराणा माल मिळत असल्यामुळे गावाकडील लोकांची मज्जा होताना दिसत आहे.
त्यात भर म्हणजे घरातील कोणालाही कामाधंद्याला जायचे नसल्यामुळे महिलांना डब्याचे टेन्शन नाही. लवकर उठण्याचे टेन्शन नाही. त्यामुळे गावाकडील महिला दुपारच्यावेळी पाक कृतीत अडकल्या आहेत. एकीने जिलेबी बनवली की दुसरी भजी बनवते. वडापाव, पावभाजी, पाणीपुरी, केक, मिसळ, ढोकळा आदी खाद्यपदार्थांची रेलचेल सुरू आहे. अनेक पक्वान्नांची ताट भरली जात आहे.
बिर्याणी, तंदुर सुद्धा घरात बनवून मैत्रीणीना, नातेवाईकांना व्हॉटसऍप, फेसबुकवरून दाखवत त्यांच्यात जणू पाककृतीची स्पर्धाच सुरू झालेली दिसत आहे. याउलट शहरातील नागरिक संचारबंदी, सील व करोनाच्या भीतीने त्रस्त झाले आहेत. दरम्यान लॉकडाऊनमध्ये पुरेपूर आनंद घेणारी कुटुंबे रोज वेगवेगळे मेनू खात आहेत. मात्र, लॉकडाऊननंतर आपली भरमसाठ वजने वाढण्याची चिंता आता गावाकडील लोकांना सतावू लागली आहेत.