कोलकता – पश्चिम बंगालमध्ये इयत्ता बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी अनेक दिवस व्यापक निदर्शने केली. नापासांची ती अनोखी मेहनत अखेरीस फळास आली. बंगालच्या उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सोमवारी सर्व नापास विद्यार्थी पास झाल्याची घोषणा केली.
करोना संकटामुळे देशातील इतर राज्यांप्रमाणेच बंगालमध्येही बारावीची परीक्षा झाली नाही. त्यामुळे मुल्यांकन पद्धतीचा वापर करून बंगाल मंडळाने 22 जुलैला निकाल जाहीर केला. त्यानुसार, सुमारे 8 लाख म्हणजेच जवळपास 98 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्या निकालाने नापास विद्यार्थी नाराज झाले.
परीक्षाच झाली नसल्याने आम्हालाही उत्तीर्ण केले जावे, अशी मागणी करत त्यांनी थेट निदर्शनांचा मार्ग अवलंबला. निदर्शनांवेळी विद्यार्थ्यांनी रास्ता रोको केले. काही शाळांमध्ये तोडफोडीच्या घटना घडल्या. त्याशिवाय, शिक्षकांना घेराव घातला गेला.
त्या निदर्शनांची दखल राज्य सरकारने घेतली. सरकारशी चर्चा करून शिक्षण मंडळाने नापास विद्यार्थ्यांनाही पास करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आधी अनुत्तीर्ण ठरलेले सुमारे 18 हजार विद्यार्थी आता उत्तीर्ण झाल्याचा आनंद घेऊ शकणार आहेत.