मुंबई : ज्या प्रवाशांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तसेच दुसरा डोस घेऊन १४ दिवस झाले असतील त्यांना १५ ऑगस्ट २०२१ पासून उपनगरीय रेल्वेमधून प्रवास करण्यास मुभा देण्यात येत असल्याची घोषणा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.
मुख्यमंत्र्यांनी सात दिवसांवर येऊन ठेपलेल्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतांना नागरिकांनी संयम बाळगावा, गर्दी करू नये, कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून कोरोनाला हरवण्याची जिद्द मनात कायम ठेवावी असे आवाहन केले.
दरम्यान, लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना पास मिळणार आहे. मात्र हा पास मिळणार कसा याबाबत प्रवाशांमध्ये संभ्रम आहे. याबाबत मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी लोकल प्रवासाबाबत माहिती दिली आहे की,’जवळपास 19 लाख लोकांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत. डोस घेऊन 14 दिवस झाल्यानंतर ओळखपत्र दिलं जाईल. त्यानंतरच लोकल प्रवासाचा पास मिळणार आहे’
ते पुढे म्हणाले,’प्रवाशांकडे लसीकरणाच्या प्रमाणपत्राची आवश्यकता असून त्या प्रमाणपत्राचा नंबर आणि संबंधित प्रवाशाच्या फोटोच्या आधारावर पास दिला जाईल तसंच हा पास अॅपमार्फत ऑनलाईन पद्धतीनेही काढता येईल, ज्या लोकांना ऑनलाईन पास काढणं शक्य नाही त्यांना ऑफलाईन पास देण्याची सुविधा देण्यात येईल’
फोटो पासेसवर क्यु आर कोड
ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत असे प्रवासी रेल्वेचा पास ॲपवरून डाऊनलोड करू शकतील आणि ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही असे प्रवासी शहरातील पालिकेच्या प्रभाग कार्यालयातून तसेच उपनगरीय रेल्वे स्थानकांमधून फोटो पासेस घेऊ शकतील. या लोकल प्रवासाच्या पासेसवर क्यू आर कोड असतील असेही ते म्हणाले.