माहिती अधिकारात उघड : चार दिवसांचे मुख्यमंत्री असताना 5380 कोटींच्या मदतीची केली होती घोषणा
वाघळवाडी-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांना हाताशी धरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 4 दिवसांचे सरकार स्थापन केले होते. त्यादरम्यान राज्यावर अवकाळी पावसाचे संकट आले होते. शेतकरी हवालदिल झाला होता. अशा प्रसंगात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरुन शेतकऱ्यांना 5380 कोटींच्या मदतीची घोषणा केली होती; मात्र ही घोषणा “फेक’ असल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे.
बारामतीचे माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी याचसंबंधीच्या कागदपत्रांची मुख्यमंत्री कार्यालय आणि मुख्यमंत्री सचिवालयाला माहिती मागितली होती. यादव यांनी मागवलेल्या माहितीत नमूद केले आहे की, 23 नोव्हेंबर 2019 ते 26 नोव्हेंबर 2019 या काळात एकही फाइल मुख्यमंत्री कार्यलयात आली नाही किंवा बाहेर गेली नाही. त्यामुळे फडणवीसांनी शेतकऱ्यांना केलेली मदत फसवी असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, माहिती अधिकारातून बाहेर आलेल्या माहितीतून फडणवीस उघडे पडले आहेत. त्यामुळे विरोधक त्यांच्यावर तुटून पडण्याची शक्यता आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रावर पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात प्रचंड असं नुकसान झाले होते. यानंतर फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी साधारण 5380 कोटी रुपयांची घोषणा केली होती. फडणवीस यांच्या काळात शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या घोषणेची मोठी जाहीरातबाजी केली गेली. शेतकऱ्यांच्या दु:खावर मीठ चोळण्याचे काम तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी केले आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटत आहे.
- 23 नोव्हेंबर 2019 ते 26 नोव्हेंबर 2019 या काळात या चार दिवसांत एकही फाइल मुख्यमंत्री कार्यालयात आली नाही अथवा बाहेर गेली नाही ना कोणताच धोरणात्मक निर्णय या चार दिवसांत झाला नाही. यावषन राज्यातील जनतेशी धादांत खोटं बोलण्याचे काम फडणवीस यांनी केले, हे माहिती अधिकारातून सरळ सरळ स्पष्ट होते.
– नितीन यादव, सोमेश्वरनगर, बारामती - निधी आकस्मित निधीतून दिला
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केलेली घोषणेचा निधी राज्याच्या आकस्मित निधीतून देण्यात आला आहे. तसेच हा निधी मंजूर देखील करण्यात आला होता, असे स्पष्टिकरण तत्कालीन मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाने दिले आहे.