राहुरी -संस्थात्मक क्वारंटाईन होण्यासाठी दिल्लीहून आलेल्या विद्यार्थ्यास राहुरी फॅक्टरी येथील डी पॉल इंग्लिश मीडियम स्कूलच्या वस्तीगृहात पहिल्या दिवशी अनेक गैरसुविधांचाच सामना करावा लागला. दुसऱ्या दिवशी त्याने संबंधित यंत्रणांचे दरवाजे ठोठावले, तेव्हा मात्र या यंत्रणांनी त्याचे त्वरित दखल घेतली. मात्र हा माझ्या एकट्याचाच प्रश्न नसून अन्य क्वॉरंटाईन व्यक्तींना किमान प्राथमिक सुविधा मिळाव्यात हा त्याचा आग्रह होता. त्याच्या पाठपूराव्यास अधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिला व त्याला आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या.
डी पॉल इंग्लिश मीडियम स्कूलच्या वसतिगृहाच्या दोन बिल्डिंगमध्ये संस्थात्मक क्वॉरंटाईनची व्यवस्था केलेली आहे. दुसऱ्या बिल्डींगमध्ये विद्युतपुरवठा नसेल तर पाणी पुरवठा खंडित राहतो. आणि पर्यायी पाणी व्यवस्था काहीच नाही. नेमका काल वीजपुरवठा खंडित असल्याने पाणीपुरवठा नव्हता. सकाळी प्रातर्विधीसाठी, आंघोळीसाठीही तेथे पाण्याची व्यवस्था नव्हती. तसेच बेडही नव्हते. कशीबशी रात्र जागून काढल्यानंतर सकाळी नगराध्यक्ष सत्यजित कदम, मुख्याधिकारी अजित निकत यांनी या तक्रारीची दखल घेत लगेचच त्या विद्यार्थ्याची व्यवस्था दुसऱ्या ठिकाणी केली. त्या ठिकाणी मात्र आवश्यक त्या सुविधांची पूर्तता होती. नंतर त्यास वायफायसह स्वतंत्र रूमची व्यवस्था करण्यात आली. दोन दिवसांपूर्वी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तर पहिला मजला चढून जाण्याची तसदी घेतली नाही. खाली जमीनीवर उभे राहून मोठ्याने आवाज देतच त्यांनी क्वॉरटाईन व्यक्तींना सर्दी, पडसे नी कोणी आजारी आहेत काय अशी विचारणा केली.
राहुरी येथील महाविद्यालयांमध्ये रुम अस्वच्छ तर होत्याच पण ती स्वच्छता करण्याची साधने देखील नव्हती. आपण आपल्या घरी नाही का स्वच्छता करत असेही ऐकवले गेले. पुरेशा पाण्याची उपलब्धता नसणे, अंथरूण-पांघरूण, अन्नाची व्यवस्था नसणे अशा अनेक असुविधांचा सामना या लोकांना करावा लागला. अनेक रूम्स अनेक दिवस वापरात नसल्यामुळे अस्वच्छ होत्या. याबाबत चौकशी केली असता अधिक सुविधांसाठी आपण नगरला जिल्हा कार्यालयाच्या ठिकाणी मुख्य ठिकाणी आपणास हलवण्याची व्यवस्था करावी लागेल असे ऐकवण्यात आले.
राहुरी महाविद्यालयातील वस्तीगृहाच्या काही खोल्या बरेच दिवस वापराविना होत्या. त्यामुळे स्वच्छतेचे काही प्रश्न होते. मात्र आता ते पूर्णपणे सुटले आहेत. पालिकेतर्फे दररोज परिसराची स्वच्छता केली जात आहे. जंतुनाशक फवारणी करण्यात आली आहे. पुरेसे पिण्याचे पाणी व वापरासाठी पाणी उपलब्ध आहे. तीस जण क्वॉरंटाईन आहेत. त्यांना बेडची व्यवस्था करण्यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणी चालू आहेत. आरोग्य अधिकारी पथकाद्वारे आरोग्य तपासणी होते आहे.
डॉ. श्रीनिवास कुर्ऱ्हे मुख्याधिकारी नगरपालिका, राहुरी