नवी दिल्ली – दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचे किसान एकता मोर्चा हे फेसबुक पेज काल अचानक तीन तासांसाठी बंद झाले होते. त्यावरून मोठाच गदारोळ माजला होता. शेतकऱ्यांचा आवाज दाबून टाकण्याचाच हा प्रकार होता अशी चौफेर टिका सुरू झाली होती.
तथापि या अकाऊंटवर अचानक मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्हीटी सुरू झाल्यामुळे सिस्टीममधील तरतूदींनुसार त्यात काहीं तरी गडबड असल्याचा संदेश पाठवून हे पेज बंद झाले होते. पण आम्ही ते तीन तासांच्या अवधीत पुन्हा सुरू केले आहे असे फेसबुकने आपल्या खुलाशात म्हटले आहे.
फेसबुकच्याच मालकीच्या इन्स्टाग्रामवर मात्र किसान एकता मोर्चाचे पेज सुरू होते असा खुलासाहीं फेसबुकने केला आहे. त्यामुळे फेसबुक पेज बंद करण्यामागे शेतकऱ्यांचा आवाज दाबून टाकण्याचा किंवा तत्सम खोडसाळपणा करण्याचा इरादा नव्हता, सिस्टीम मधील ऑटोमेटेड तरतूदीतून हा प्रकार घडला आहे असे फेसबुकने स्पष्ट केले आहे.
हे पेज बंद पडल्यानंतर आंदोलकांच्या वतीने तसेच त्यांच्या समर्थकांच्यावतीने सोशल मिडीयावर यावर जोरदार आवाज उठवण्यात आला होता. व फेसबुकच्या या कृतीच्या विरोधात त्यांनी निषेधही नोंदवला होता.