कोरेगाव -साताऱ्यासह इतर जिल्ह्यांमधील साखर कारखान्यांकडे होणाऱ्या ऊस वाहतुकीमुळे कोरेगाव शहर, तालुक्यातील रहिमतपूर, वाठार स्टेशन व सातारारोड येथे प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. अपघातांची मालिकाही सुरू आहे. या वाहनांसाठी सुरक्षिततेचे नियम तयार करून अंमलबजावणीसाठी कारखान्यांच्या प्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, अशी सूचना प्रांताधिकारी ज्योती पाटील यांनी दिली. याबाबत गुरुवार, दि. 12 रोजी पुन्हा व्यापक बैठक घेणार असून, त्यामध्ये कारखान्यांच्या प्रतिनिधींनी वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा, असा आदेशही त्यांनी दिला.
साखर कारखान्यांच्या गळीत हंगामात ऊस वाहतुकीमुळे होणारी वाहतूक कोंडी व अपघात रोखण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी कोरेगाव तहसील कार्यालयात नुकतीच बैठक झाली. परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक रितू खोखर, तहसीलदार अमोल कदम, गटविकास अधिकारी क्रांती बोराटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल घोंगडे, मोटार वाहन निरीक्षक एम. एन. पाटील, कोरेगाव नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी विजया घाडगे उपस्थित होत्या. ज्योती पाटील म्हणाल्या, तहसीलदार अमोल कदम व मी नुकताच पदभार स्वीकारला आहे, कोरेगाव शहर व तालुक्यातील समस्या जाणून घेताना ऊस वाहतुकीमुळे होणाऱ्या अपघातांचा विषय गंभीर असल्याचे लक्षात आले.
याबाबत ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. शहरातून होत असलेल्या ऊस वाहतुकीमुळे वाहतूक कोंडी व अपघात होत आहेत. सोमवार व गुरुवार या आठवडा बाजारादिवशी वाहतूक कोंडी रोखणे आवश्यक आहे. त्यामुळे साखर कारखाना प्रतिनिधींनी वाहतूकदारांना शिस्त लावली पाहिजे.
जास्तीत जास्त ऊस वाहतूक रात्री करता येईल का, याची चाचपण करावी. कारखान्यांच्या प्रतिनिधींनी वाहतूक आरखड्यासह अहवाल सादर करावा. आठवडा बाजारादिवशी ऊस वाहतुकीमुळे खोळंबा होत असल्याच्या रहिमतपूर, वाठार स्टेशन, सातारारोड येथील नागरिकांच्याही तक्रारी आहेत. त्यामुळे पर्यायी मार्गांवरून ऊस वाहतूक विनाविलंब होण्यासाठी समन्वय आवश्यक आहे, असे मत अमोल कदम यांनी व्यक्त केले.
जरंडेश्वर शुगर मिल्सचे कार्यकारी संचालक विजय जगदाळे, सह्याद्रि कारखान्याचे रहिमतपूर विभाग अधिकारी कदम यांनी चर्चेत मते मांडली. साखर कारखान्यांबाबतच्या निर्णयांचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर होतो. त्यामुळे सक्तीने निर्णय लादू नयेत, असे जगदाळे म्हणाले,. दरम्यान, गुरुवारी (दि. 2) दुपारी 4 वाजता सार्वजनिक व जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अभियंत्यांसमवेत पुन्हा व्यापक बैठक होणार असल्याचे ज्योती पाटील यांनी सांगितले.