बीड: ऑफलाइन पद्धतीने होणाऱ्या शिक्षकांच्या बदल्यांमुळे भ्रष्टाचार आणि शोषण होईल, असा दावा भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केला आहे. यावर राज्य सरकारने पुनर्विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली. पंकजा मुंडे यांनी मंत्रिपदी असताना शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांबाबत घेतलेला निर्णय ठाकरे सरकारने बदलला.
करोनाच्या धर्तीवर शिक्षकांच्या बदल्या ऑफलाइन पद्धतीने होणार असे ऐकले. ज्याचा वशिला नाही, वाली नाही आणि त्या गरीब शिक्षकांसाठी हा ऑफलाइनचा निर्णय करोनाच्या संकटात आणखी संकट आणेल. यावर राज्य सरकारने पुनर्विचार करण्याची गरज आहे. पारदर्शकता आणि मेरिट सोडून भ्रष्टाचार व शोषण होईल, असे ट्वीट पंकजा मुंडे यांनी केले आहे.
शिक्षकांच्या बदल्यांमधील वशिलेबाजी रोखण्यासाठी फडणवीस सरकारने, विशेषकरुन तत्कालीन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी ऑनलाइन बदल्यांचे धोरण अवलंबले होते. मात्र महाविकास आघाडी सत्तेत येताच हे धोरण बदलून बदल्यांचे अधिकार पुन्हा जिल्हा परिषदेकडे सोपवण्यात आले.
दरम्यान, राज्यभरातील तब्बल 45 शिक्षक संघटनांनी या संदर्भातील मागण्या अभ्यासगटाला दिल्या होत्या. अंतर्गत बदली झाल्यानंतर एकाच शाळेवर तीन वर्षानंतर पुन्हा बदलीसाठी विनंती अर्ज करता येण्याची मुभा द्यावी, अशा अनेक सूचना ग्रामविकास विभागाने या संदर्भात नेमलेल्या अभ्यास गटापुढे शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी मांडल्या होत्या.
कोरोनाच्या धर्तीवर शिक्षकांच्या बदल्या off line पद्धतीने होणार असे ऐकले,ज्याचा वशिला नाही,वाली नाही आणि त्या गरीब शिक्षकांसाठी हा offlineचा निर्णय कोरोनाच्या संकटात आणखी संकट आणेल राज्यसरकार ने यावर पुनर्विचार करण्याची गरज आहे..पारदर्शकता आणि मेरिट सोडून भ्रष्टाचार व शोषण होईल
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) July 16, 2020