“मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती’ असं वाक्य आपण समाजात वावरताना अनेकवेळा ऐकत असतो. आजकाल अनेक मुले आपल्या आई-वडिलांना म्हणतात, “माझ्याकडून तुम्ही काही अपेक्षाच ठेवू नका म्हणजे अपेक्षाभंग होणार नाही.’ चमकदार वाक्य म्हणून हे ठीक आहे, पण मग सगळ्या समाजाचा गाडाच कोलमडून पडेल कारण घरातलं, समाजातलं किंवा देशातलं प्रत्येकच नातं अपेक्षा करत असतं.’ ई-बाप मुलासाठी कष्ट करतात, प्रसंगी उपाशी राहतात किंवा काहीजणांच्या विरोधातही जातात. त्यावेळी उघड नाहीतरी सुप्त अपेक्षा असतेच की मुलानं त्यांच्याशी कृतज्ञ राहावं, म्हातारपणी सांभाळ करावा, वृद्धाश्रमात टाकू नये पण मुले म्हणतात, कष्ट केलेत म्हणून काय झालं? तुमचं ते कर्तव्यच होतं. मी काही तुमच्याकडे आलो नव्हतो मला जन्म द्या असं म्हणत.’
सध्या समाजात अनेकजण आहेत. त्यांची मुले परदेशात आहेत, ते दरमहा पैसेही पाठवत असतील पण त्यानं काही प्रेमाची, आपुलकीची, बोलण्याची किंमत येत नाही. मात्र मुलांच्या शिक्षणाच्या, छंद-आवडी पुरवण्याच्या, चैनीच्या या अपेक्षा मात्र पालकांनी पूर्ण करायच्या वर त्याच्याकडून काहीच अपेक्षा ठेवायची नाही? वा रे न्याय! नवरा-बायको हे नातं तर मुळातच अपेक्षेवर आधारलेलं आहे. एक तर रजिस्टर करणं हा लग्नाचा व्यवहार आहे. जिथं कायदा येतो, तिथं रुक्षपणा, हिशेबीपणा येणारच. पूर्वीच्या काळात नवऱ्यानं कुटुंबाच्या सर्व आर्थिक गरजा पुरवाव्यात आणि बायकोनं नवरा देईल तेवढ्या पैशात कुटुंबाचं स्वयंपाकपाणी, आजारपणं, देणी-घेणी, बचत एवढ्या गोष्टी कराव्यात अशी अपेक्षा होती.
आजच्या काळात बायका शिकून नोकरी व्यवसाय करतात, इतर काही करून कुटुंबाच्या आर्थिक गरजा पूर्ण करायला हातभार लावतात मग नवऱ्यानं मुलांचं पाहण्यात मदत करावी, स्वयंपाक अन्य जबाबदाऱ्या वाटून घ्याव्यात अशी अपेक्षा महिला करत असतील तर त्यात चूक काय? आई-मुलं, नवरा-बायको यात अनेकदा अपेक्षा स्पष्ट बोलून दाखवल्या जात नाहीत. एकमेकांना गृहीत धरलं आणि तसं समोरचा वागला नाही तर अपेक्षाभंग होतो आणि मतभेद किंवा भांडणं होतात.
शिक्षकांनी शिकवावं कसं? या क्षेत्रातली सगळ्या विषयांची पुस्तकं आम्ही खूप दशकं प्रकाशित करत होतो, पण आताच्या पिढीतले होणारे काही शिक्षक वर्गात तर जात नाहीतच शिवाय गाईड, नोट्स वाचून उर्त्तीण होतात. त्यांना किती शिकवता येतं हे माहीत नाही पण पगार मात्र सहाव्या-सातव्या वेतन आयोगाचा हवा. हे कसं चालेल?
काही वकील तर व्यवसायासाठीच खऱ्याचं खोटं करतातच पण काही डॉक्टरही आता व्यावसायिक होऊ लागले आहेत. तपासण्या, महागडी औषधे, कारण नसताना दवाखान्यात ऍडमिट करणे हे सगळं कशासाठी? फक्त त्यांचे संसार चालावेत म्हणून? मग पूर्वी पण ते चालत होतेच की! पण तेव्हा रुग्णांची काळजी होती. डॉक्टरला रुग्ण नातेवाईकच वाटत. मी माझ्या फॅमिली डॉक्टरला “मामा’ म्हणतो. दोन-चार वेळा त्यानं सलाईनसाठी मला ऍडमिट न करता केवळ लिंबू-पाणी, मीठपाणी प्यायला सांगून मला तणावातून वाचवलं आहे. पोलिसांनी जनतेचं संरक्षण करावं अशी, अपेक्षा असते. मग चौकाचौकातलं चित्र पाहिलं तर वास्तव कळायला मदत होईल.
चारचाकी गाडीवर “न्यायाधीश’ लिहू नये असे आदेशच सरकारने काढले आहेत. आर्मी, माजी सैनिक, सरपंच, व्हीआयपी अशा हजारो पाट्या लावून वाहनं नियम मोडत रस्त्यांवरून हिंडत आहेत. तीच गोष्ट निवडून दिलेल्या नेतेमंडळींची. निवडून येईपर्यंत सोसायट्यांची चौकशी करणारे, नोकऱ्या, मोफत सहली अशी व्यवस्था करणारी ही नगरसेवक, आमदार, खासदार मंडळी नंतर कुठे गायब होतात? सामान्य माणसानं त्यांच्याकडून अपेक्षा करायची नाहीतर काय अशिक्षित, बेरोजगार माणसाकडून?
अपेक्षा आपल्या इतरांकडून, इतरांच्या आपल्याकडून आणि आपल्या आपल्याकडून असतात. अपेक्षांच्या हट्टी मागण्या होऊ देऊ नयेत. दुसऱ्याकडूनच्या अपेक्षा बोलून दाखवाव्यात. इतरांच्या आपल्याकडूनच्या अपेक्षा पूर्ण होणार नसतील तर तसं स्पष्ट सांगावं. (अर्धवट आणि गोडगोड बोलणं पण खोटं नसावं.) स्वतःची पायरी ओळखून अपेक्षा ठेवाव्यात. तरुणानं नायिकेशी लग्न करण्याची किंवा विना अनुभवाचं असताना “सर’ किंवा “मॅडम’ होण्याची (बॉस) अपेक्षा ठेवू नये. अपेक्षाभंगाचं दुःख उगाच उगाळत बसू नये. नव्या कामाला लागावं, नव्या ओळखी करून घ्याव्यात. (आणि त्यांच्या कुवतीनुसार अपेक्षा कराव्यात.)
सहजानंद