नवी दिल्ली, – उत्तरप्रदेशची सत्ता राखण्यात भाजपला यश मिळेल. तर, पंजाबमध्ये आप बाजी मारेल, असे अंदाज मतदानोत्तर चाचण्यांनी (एक्झिट पोल्स) वर्तवले आहेत. उत्तराखंड जिंकण्याची भाजप आणि कॉंग्रेसला समसमान संधी आहे. गोव्यात त्रिशंकू स्थिती निर्माण होईल, असे निष्कर्षही त्या चाचण्यांनी काढले आहेत.
उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीतील अखेरच्या टप्प्यासाठी सोमवारी मतदान झाले. ती प्रक्रिया पूर्ण होताच मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले. राजकीयदृष्ट्या सर्वांत महत्वाचे राज्य असणाऱ्या उत्तरप्रदेशात सत्तारूढ भाजप पुन्हा स्पष्ट बहुमत मिळवणार असल्याचे त्या निष्कर्षांतून सूचित होते. उत्तरप्रदेशात विधानसभेच्या एकूण 403 जागा आहेत. त्यातील 211 ते 277 जागा भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीच्या (एनडीए) वाट्याला दाखवण्यात आल्या आहेत. समाजवादी पक्षाच्या नेतृत्वाखालील आघाडीला 119 ते 160 जागा मिळण्याची शक्यता आहे.
मतदानोत्तर चाचण्यांनी पंजाबमध्ये सत्ताबदलाचे भाकीत केले आहे. त्या राज्याची सत्ता कॉंग्रेसकडून आपच्या ताब्यात जाईल. पंजाबमधील 117 पैकी 76 ते 90 जागा आप खिशात घालेल, असे काही चाचण्यांवरून सूचित होते. काही चाचण्यांनी त्यापेक्षा कमी जागा दाखवल्या असल्या तरी आप बहुमतापर्यंत मजल मारणार असल्याचे म्हटले आहे. पंजाबमध्ये कॉंग्रेसला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागण्याची शक्यता आहे.
गोव्यात कुणालाच स्पष्ट बहुमत मिळणार नाही. त्या राज्यात त्रिशंकू स्थिती निर्माण होईल, असे अंदाज बहुतांश चाचण्यांनी वर्तवले आहेत.