सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांसह कोकणातल्या महापुराचे थैमान (केरळही) आपण सर्वांनी पाहिले, अनुभवले आहे. महापुरामागची कारणे शोधण्याची मोहीम सुरू असली तरी तरी त्यातले महत्त्वाचे कारण आहे ते म्हणजे वैश्विक तापमानवाढ अर्थात ग्लोबल वॉर्मिंग! काही वर्षांपूर्वी अशीच महापुरासह भूकंपाची आपत्ती उत्तराखंडमध्ये आली होती. नद्यांना येणारे पूर, कोसळणाऱ्या दरडी आणि यामुळे होणारी प्राणहानी याच आता मुख्य समस्या बनत आहेत. गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, तमिळनाडू आणि केरळला जोडणारा पश्चिम घाट म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेची जीवनरेखा आहे. याच 1600 किमी उत्तर-दक्षिण पर्वतरांगेमुळे भारतात मोसमी पाऊस पडतो; ज्यावर देशाची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. मात्र, याच भागातल्या निसर्गावर गेल्या काही दशकांत आपण इतकी आक्रमणे केली आहेत, की आता सर्वाधिक नैसर्गिक आपत्ती पश्चिम घाटात येत आहे. बेसुमार वृक्षतोड, नद्यांतील वाळूचा अनिर्बंध उपसा, बंधनमुक्त खाणउद्योग, रासायनिक आणि प्रदूषणकारी उद्योगांची वाढ तसेच प्लॅस्टिक कचरा, स्वच्छतेचा अभाव, कॉंक्रिटच्या वाढत्या इमारती, सिमेंटचे रस्ते या आणि अशा अनेक कारणांनी परिसराचे तापमान वाढते आहे.
अशातच भारतीय उत्सव साजरे करताना होणारे हवा, पाणी आणि ध्वनीचे प्रदूषण या गोष्टींवर लक्ष दिले जात नाही. कानठळ्या बसवणाऱ्या डीजेच्या वॉल्स, ढोल-ताशा पथकांचा दणदणाट यासह विशेषत: गणेशोत्सवात होणारा प्लॅस्टर ऑफ पॅरिस या घातक रसायनाचा वापर आणि त्यापासून बनवलेल्या मूर्तींचे नदीपात्रात केले जाणारे विसर्जन यामुळे जलप्रदूषणात भरच पडते आहे. हे प्लॅस्टर ऑफ पॅरिस नदीच्या पाण्यात विरघळत नाही. शिवाय मूर्ती रंगवताना वापरलेले रंग विषारी रसायनांपासून बनलेले असतात. तेही पाण्याच्या प्रदूषणात मोठी भर घालतात. गणेशोत्सवाच्या निमित्ताने होणारे हे संभाव्य प्रदूषण टाळणे हे आपल्याच हातात आहे, नाही का? म्हणून दै. प्रभातने आपल्या सामाजिक उत्तरदायित्वाच्या मोहिमेचा भाग म्हणून “ग्रीन गणेशा-2019′ अर्थात पर्यावरणस्नेही गणेशाची मूर्ती बनवण्याच्या कार्यशाळेचा संकल्प सोडला. आज तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या विद्यार्थ्यांना स्वत:च शाडूमातीची मूर्ती बनवण्याचे तंत्र शिकवले, तर असे विद्यार्थी भविष्यात अशाच शाडूच्याच मूर्ती बसवतील आणि पर्यावरण रक्षणाच्या मोहिमेत आपला अल्पसा का होईना, सहभाग नोंदवतील, याच हेतूने या कार्यशाळेचे आयोजन दै. प्रभाततर्फे दि. 26 ते 30 ऑगस्ट 2019 दरम्यान करण्यात आले. यासाठी जागतिक कीर्तीचे शिल्पकार प्रमोद कांबळे आणि त्यांचे सहकारी नितीन ठाकरे यांचे मार्गदर्शन लाभले.