नेवासा (प्रतिनिधी) – महसूल खात्याच्या अर्थपूर्ण संबंधातून मूळ जागामालकाला क्लीन चिट देत जागा मालकाने शेती प्लॉट विकूनही कामगार तलाठी कार्यालयातून नोंदी न लावल्यामुळे मूळ जागा मालक आणि महसूल विभागाच्या अर्थपूर्ण संबंधातून प्लॉटधारकांवर अन्याय केला जात असल्याच्या तक्रारी शहरातील सावतानगर प्रभागातील नागरिकांतून केल्या जात आहेत.
येथील रहिवाशांनी रितसर दुय्यम निबंधक कार्यालयात मूळ मालकांकडून जागा खरेदी करूनही गेल्या एक-दोन वर्षांपासून खरेदीत कामगार तलाठी कार्यालयात देऊनही अद्यापपर्यंत नोंदी न लागल्यामुळे खरेदीधारक जागामालक हैराण बनले आहेत. महसूल विभागाचे वराती मागून घोडे दामटण्याच्या सदरात हा कारभार मोडणारा असल्यामुळे शहरातील सावतानगर प्रभागातील जागा खरेदीधारकांना न्याय कधी मिळणार? असा संतप्त सवालही उपस्थित केला जात आहे.
शहरातील सावतानगर प्रभागातील गट नंबर 150 क्षेत्रातील एका मूळ शेतीमालकासह त्यांच्या मुलाने शेतीचे प्लॉट करून चक्क गुंठा- दोन गुंठे जागा विकता विकता अनेक गुंठे जागा विकली गेली आहे. मात्र, कामगार तलाठ्यांकडे रितसर खरेदी खत देऊनही नोंदी ओढल्या गेलेल्या नाहीत आणि ज्यांच्या नोंदी ओढण्यात आल्या आहेत, त्यामध्ये महसूल विभागाने अक्षम्य चुका करून ठेवल्यामुळे आता महसूल विभागाने चक्क 150 गट नंबरच महसूल दफ्तरी बंद केलेला आहे. त्यामुळे रितसर खरेदी केलेल्या जागामालकांच्या प्लॉटच्या नोंदी लागल्या जात नाही. या खरेदी केलेल्या जागेवर घरे, बंगले बांधूनही झालेले आहेत. त्यामुळे कर रूपात महसूल खात्याचा करही बुडत असताना महसूल विभाग मात्र झोपेचे सोंग घेताना दिसून येत आहे.
Delhi excise policy case : मनीष सिसोदियांची तुरुंगातच साजरी होणार ‘होळी’
या चुका महसूल विभागाच्या असल्या तरी “भोग’ मात्र जागा खरेदीधारकांना भोगावा लागत आहे. याबाबत वेळोवेळी महसूल विभागात पाठपुरावा केला जात असला, तरी काम शेवटच्या टप्प्यात असल्याचे सांगून महसूल विभाग चालढकल करताना दिसून येत आहे. त्यामुळे सावतानगरचे नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे खरेदीधारक प्लॉटधारकांनी या वेळी सांगितले आहे.
मी विधवा असून, येथे दोन गुंठे जागा घेतली. रितसर खरेदी खत कामगार तलाठी कार्यालयात दिलेले आहे. मात्र, दोन वर्षांपासून मला सात-बारा उतारा तयार करण्यासाठी हेलपाटे मारण्याची वेळ आली असून, दरवेळी वेगवेगळी कारणे दिली जात आहेत.
– अलका मगर, जागा खरेदीधारक, सावतानगर
तहसीलदारांचे आठ दिवस कोणते?
तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांच्याकडे याबाबत तक्रारी केल्यानंतर नेहमीच आठ दिवसांत प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन मिळत असल्याचे येथील नागरिकांकडून सांगण्यात येत असल्यामुळे चुकीचा घोळ कधी सुटणार आणि संबंधितांच्या नोंदी कधी लावणार? असा यक्ष प्रश्न उपस्थित केला जात आहे.
वेळकाढू भूमिका
सावतानगर प्रभागाच्या गट नंबर 150ची कैफियत दैनिक प्रभातने वारंवार प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलेली आहे. मात्र, शेवटच्या टप्प्यात वेळकाढू भूमिका उठवली जात असल्याची माहिती प्लॉट खरेदीधारकांनी या वेळी बोलतांना दिली.