पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार आदर्श निवडणूक आचारसंहिता लागू झाली असून, ६ जूनपर्यंत ती लागू राहणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या परिसरात आदर्श निवडणूक आचारसंहितेची अंमलबजावणी तात्काळ सुरू करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत.
आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस शिरुर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. दिवसे म्हणाले, जिल्ह्यात दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी शासकीय- निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले भित्तिपत्रक, झेंडे, कटआउट्स, संदेश काढून त्याचा अहवाल २४ तासांत सादर करावा. भिंतीवरील रंगविलेल्या जाहिरातीदेखील काढण्यात याव्यात.
निवडणूक यंत्रणेने गेल्या तीन महिन्यांत मतदार नोंदणी आणि जनजागृतीसाठी चांगले परिश्रम घेतले आहेत. यापुढेही चांगली कामगिरी करून निवडणुका पारदर्शक आणि मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. बैठकीला जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांतील सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, आदर्श आचारसंहिता समन्वयक अधिकारी उपस्थित होते.
सार्वजनिक मालमत्तेवरील जाहिराती काढा
शासकीय मैदाने, रस्ते, उद्याने, विद्युत खांब, खासगी मालमत्तेवर परवानगी न घेता लावलेली भित्तिपत्रके किंवा संदेशही ४८ तासांत काढण्यात यावेत. परवानगी न घेता खासगी मालमत्तेवर जाहिरात केली असल्यास गुन्हे दाखल करण्यात यावेत. सर्वांनी काटेकोरपणे निवडणूक आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी दिले.
सर्व राजकीय पक्षांना समान संधी
महापालिका क्षेत्रात जाहिरात फलकावर राजकीय जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी सर्वांना समान संधी असावी व त्याबाबतचा करार झालेला असावा. त्याची खर्चात नोंद होणे आवश्यक आहे. निश्चित केलेल्या सभेच्या ठिकाणी सर्व राजकीय पक्षांना सभा घेण्याची समान संधी देण्याबाबत संबंधित यंत्रणेमार्फत कार्यवाही करण्यात यावी.
पक्षांनी परवानगी घेतलेल्या खासगी वाहनाशिवाय इतर वाहनांवर जाहिरात करता येणार नाही. अशी वाहने आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असेही जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी सांगितले.