सातारा -करोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरु असताना महाराष्ट्रातील परप्रांतीय मजूर आणि कामगार त्यांच्या राज्यात परतले आहेत. सद्यस्थितीला प्रशासनाने औद्योगिक कंपन्या सुरु करण्यास परवानगी दिली असून सातारा एमआयडीसीतील कंपन्या सुरु झाल्या आहेत. परप्रांतीयांच्या जाण्याने स्थानिकांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे स्थानिक भूमिपुत्रांनी या संधीचे सोने करून विविध कंपन्यांमध्ये आपल्या शैक्षणिक अहर्तेनुसार नोकरी मिळवावी आणि बेरोजगारीला आळा घालावा, असे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे.
शिवेंर्द्रसिंहराजे यांनी सांगितले की, रोजगार उपलब्ध नाही, नोकरी मिळत नाही. परप्रांतीयांमुळे एमआयडीसीत स्थानिकांना नोकरी नाही. त्यामुळे स्थानिक तरुणांना रोजगारासाठी पुणे, मुंबईवर अवलंबून राहवे लागते, असे आपण नेहमीच ऐकतो. आज परिस्थिती वेगळी आहे. लॉकडाऊनमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून जे ते आपापल्या राज्यात, घरी परत जात आहेत. साताऱ्यातूनही हजारो परप्रांतीय त्यांच्या राज्यात परत गेले आहेत. त्यामुळे सातारा औद्योगिक वसाहतीतील विविध कंपन्यांमध्ये टर्नर, फिटर, हेल्पर, मशीन ऑपरेटर, गवंडी, सुतार अशा अनेक पदांच्या जागा रिक्त झाल्या आहेत. विविध ट्रान्सपोर्ट कंपन्यांमध्ये वाहन चालकांची पदे रिक्त झालेली आहेत. करोनासारखी साथ वाईट आहेच. पण, यामुळे रोजगाराची मोठी संधी निर्माण झाली आहे. ही संधी स्थानिक भूमिपुत्रांनी साधली पाहिजे.
या संधीचे सोने करणे आणि बेरोजगारीला आळा घालणे यासाठी तरुणांनी सर्वोतोपरी प्राधान्य दिले पाहिजे. स्थानिक भूमिपुत्रांना नोकरी मिळत नाही, बेरोजगारी वाढली असे म्हणण्यापेक्षा आता बेरोजगारी संपुष्टात आणण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे स्थानिक बेरोजगार तरुणांनी, कामगारांनी एमआयडीसीमध्ये उपलब्ध नोकरीच्या संधी शोधून त्या मिळवल्या पाहिजेत. कंपन्यांनाही कामगारांची गरज आहे. त्यामुळे बेरोजगार तरुणांनी या संधीचा फायदा घ्यावा आणि स्थानिक बेरोजगारीला आळा घालण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलावे, असे आवाहन शिवेंद्रसिंहराजे यांनी केले आहे