पुणे – वारंवार आवाहन करूनही वीजबिल थकबाकीचा भरणा होत नसल्याने महावितरणवरील आर्थिक भार वाढत आहे. त्यामुळे थकबाकीदारांनी बिलाचा भरणा लवकर करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक आणि सार्वजनिक सेवा वर्गवारीतील 47 लाख 30 हजार 900 वीजग्राहकांकडे तब्बल 2,359 कोटी 13 लाख रुपये थकले आहेत. असे असतानाही त्यांचा वीजपुरवठा तोडलेला नाही, अशी माहिती पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे यांनी दिली.
ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांत थकबाकीदार संख्येत तब्बल 14 लाख 90 हजार 300 ग्राहकांची भर पडली आहे. त्याबरोबरच थकबाकी देखील 693 कोटी 2 लाखांनी वाढली आहे.
पुणे जिल्ह्यात 9 लाख 9 हजार थकबाकीदारांची आणि 399 कोटी 41 लाख रुपये थकबाकीची रक्कम वाढली आहे. जिल्ह्यातील अकृषक 23 लाख 81 हजार 400 वीजग्राहकांकडे 1,329 कोटी 48 लाख रुपयांची थकबाकी आहे.