ब्युनोस आयर्स – भारताच्या महिला हॉकी संघाने येथे सुरु असलेल्या हॉकी स्पर्धेत अर्जेन्टिनाशी 1-1 अशी बरोबरी साधली. या सामन्यात भारतीय संघ पराभूत होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, मोक्याच्या क्षणी भारतीय संघाची कर्णधार राणी रामपालने गोल केला व सामना बरोबरीत सोडवला.
या सामन्यात 13 व्या मिनिटालाच अर्जेन्टिनाने गोल केला. नंतर संपूर्ण वेळेत भारताला गोल करण्याची एकाही संधीचा लाभ घेता आला नाही. अखेर 58 व्या मिनिटाला राणी रामपालने गोल केला व सामना बरोबरीत सोडवला.
या स्पर्धेत आता भारतीय संघाचा सामना अर्जेन्टिनाच्या ब संघाशी होणार आहे. या स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यातही भारतीय संघाने यजमान संघाशी 2-2 अशी बरोबरीच केली होती.