नवी दिल्ली – हरित बंदरांच्या उपक्रमाला चालना देण्यासाठी तसेच, शाश्वत उद्दिष्टपूर्तीचे ध्येय ठेवून, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट- जेएनपीटी ने आपल्या ताफ्यात नऊ इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश केला.
कंटेनर्सची वाहतूक करणारे भारतातील आघाडीचे बंदर म्हणून नावलौकिक असलेल्या जेएनपीटीची स्थापना झाल्यापासूनच आपल्या कार्यान्वयनात शाश्वत उपाययोजना अवलंबण्याचचे धोरण ठेवले आहे.
तसेच जेएनपीटीच्या कर्मचाऱ्यांसाठी पर्यावरण पूरक वाहतूक व्यवस्था सुरु करण्याचाही त्यांचा प्रयत्न आहे. ही ई-वाहने शून्य कार्बन उत्सर्जन करणारी असून यामुळे जेएनपीटी मधील वाहतूक हरित आणि प्रदूषणमुक्त होण्यास मदत होणार आहे. या नव्या वाहनांसाठी एक समर्पित चार्ज सेंटर देखील सुरु करण्यात आले आहे.
बंदरावरील कामांचा पर्यावरण आणि आजूबाजूच्या समुदायांवर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी जेएनपीटी सातत्याने दक्ष राहून शाश्वत आणि स्वच्छ साधानांवर भर देत असते. केवळ आर्थिकदृष्टया प्रभावी होण्यासाठीकहा नाही, तर पर्यावरण आणि सामाजिक स्थैर्य यासाठी देखील बंदर व्यवस्थापन काम करत असते.
हवामान बदलाचे होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन जगभरातील उद्योग आता पर्यावरण-जागरूक जगाची निर्मिती करण्यासाठीची आपली जबाबदारी लक्षात घेऊन त्यात योगदान देत आहेत. या इलेक्ट्रिक वाहनांचा देखभाल खर्च ही अत्यंत कमी असून, त्यांच्या वापरामुळे जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी होणार आहे.