पाटणा – निवडणूक रणनीतीज्ञ ते राजकीय नेते असा प्रवास करणारे प्रशांत किशोर यांनी आज महात्मा गांधी यांच्या जयंतीचे निमित्त साधत बिहारच्या चंपारण जिल्ह्यात गांधीजींच्या आश्रमापासून आपली यात्रा सुरू केली आहे. या साडेतीन हजार किलोमीटरच्या यात्रेत ते बिहारच्या प्रत्येक जिल्ह्यातून जाणार आहेत. जनसुराज्य यात्रा असे यात्रेचे नाव ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, प्रशांत किशोर यांनी एकेकाळी ज्या संयुक्त जनता दलात काम केले होते, त्या पक्षाचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना यात्रेबाबत विचारले असता प्रत्येकाची आपली इच्छा असते. या यात्रेशी आम्हाला देणेघेणे नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
दरम्यान, भारतीय जनता पार्टीचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 11 तारखेला जयप्रकाश नारायण यांच्या सीताबदियारा या गावाला भेट देणार आहेत. त्याबाबत विचारले असता नितीश कुमार म्हणाले की सगळ्यांना कुठेही जाण्याचा अधिकार आहे. ज्याला यायचे असेल त्यांनी यावे. आपण काय करणार? मात्र जयप्रकाश नारायण यांचे जे स्थान आहे ते आम्ही किती सुंदर बनवले आहे तेही त्यांनी पाहावे. जयप्रकाश नारायण यांना योग्य आदर आम्ही देतच आहोत.
दरम्यान वैदिक मंत्रोच्चारात प्रशांत किशोर यांची यात्रा आज सुरू झाली. 12 ते 18 महिने ही यात्रा चालणार असून त्यानंतर किशोर यांच्या राजकीय व्यासपीठात ती परावर्तीत होण्याची शक्यता आहे. मात्र जे लोक आपल्या अभियानात सहभागी आहेत तेच लोक राजकीय पक्षाच्या संदर्भात निर्णय घेतील असे किशोर यांनी म्हटले आहे.
2018 मध्ये प्रशांत किशोर जनता दलात सहभागी झाले होते. मात्र नागरिकत्व दुरस्ती कायद्याचे नितीश कुमार यांनी समर्थन केल्याबद्दल किशोर यांनी त्यांच्यावर जाहीर टीका केली होती. त्यानंतर त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले होते.