वर्धा : सर्वसामान्य माणसाला स्वातंत्र्य लढ्याशी जोडून बापूजींनी तो लढा खऱ्या अर्थाने एका मोठया जनांदोलनात परावर्तित केला. बापूजी सर्वसामान्य माणसाच्या सेवेला ईशसेवा – देशसेवा मानत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपित्याचे विचार कृतीत आणण्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न सुरू केले आहेत. समाजातल्या प्रत्येक वर्गासाठी जाणिवेने काम केले जात आहे म्हणून राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा सर्वार्थाने औचित्यपूर्ण असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्याचा समारोप तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 75 नद्यांची परिक्रमा, हॅलोऐवजी वंदे मातरम् अभियानाचा प्रारंभ आणि वर्धा जिल्हाधिकारी कार्यालय व नियोजन भवनाच्या उद्घाटनानिमित्त जिल्हा क्रीडा संकुल येथील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयाची नवीन वास्तू केवळ प्रशासकीय असू नये. ती जनतेची व्हावी. ती सर्वसामान्यांना न्याय देणारी ठरावी, असेही उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले. जगातील सर्व संस्कृती नदीच्या काठावरच निर्माण झाल्या आणि बहरल्या. जेव्हा या नद्या नष्ट झाल्या तेव्हा संस्कृती नष्ट झाल्या. सर्वांनी नद्यांचे महात्म्य जाणून घ्यावे. ती आपली माता आहे ती वाचली तरच आपण वाचणार आहोत. त्यामुळे या भावनेने साऱ्या नद्या समजून घ्याव्यात. त्यासाठी आवश्यक असणारी जनजागृती आणि प्रबोधन करण्यासाठी तसेच या नद्या प्रवाही, स्वच्छ आणि अतिक्रमणमुक्त करण्यासाठी आज सुरू करण्यात आलेला 75 नद्यांच्या परिक्रमेचा उपक्रम अत्यंत महत्वाचा आहे. या उपक्रमामुळे नद्यांशी असलेले आपले नाते पुनरुज्जीवित होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
स्वातंत्र्य लढ्यात ‘वंदे मातरम्’ हे शब्द खऱ्या अर्थाने राष्ट्रभावना चेतवणारे ठरले होते. ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम्’ म्हणणे म्हणजे गुलामगिरीच्या शृंखला तोडणे. ‘वंदे मातरम् ‘च्या माध्यमातून इतिहासातील तीच ऊर्जा आणि प्रेरणा निर्माण करण्याचा निर्धार असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. पालकमंत्री म्हणून वर्धा जिल्ह्याची जबाबदारी आपण घेतली असून महिलांच्या उद्योगासाठी क्लस्टर निर्माण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासोबतच जिल्ह्याच्या विकासाठी अडचणी दूर केल्या जातील. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी 365 कोटी रुपयांची मदत पंधरा दिवसात जिल्ह्याला देण्यात आली. त्यापैकी सुमारे 52 टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली असून उर्वरित शेतकऱ्यांना सात दिवसात मदत मिळेल, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.