मुंबई – विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी निवडणूक आज अखेर पार पडली. महाविकास आघडीकडून ज्येष्ठ नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे तर भाजपकडून आमदार भाई ऊर्फ विजय गिरकर यांच्या नावाची निवड करण्यात आली होती. या निवडणुकीत शिवसेनेने बाजी मारली असून विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी नीलम गोऱ्हे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. सभापती रामराजे निंबाळकर यांनी नीलम गोऱ्हे यांची उपसभापती म्हणून घोषणा केली.
निवडणुकीपूर्वी भाजपाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याबाबतचा निकाल गुरूवारी न्यायालय देणार असल्याची माहिती प्रवीण दरेकर यांनी दिली. तसेच या ठिकाणी न्यायालयाचा निकाल येईपर्यंत निवडणूक घेऊ नये, अशी विनंतीही त्यांनी केली होती. परंतु, सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी न्यायालायने मला अद्याप काही कळवले नाही. त्यामुळे तुम्ही काय मागणी केली आहे, हे मान्य करणार नाही. उच्च न्यायालयाने समन्स दिले तर त्यावर आपण उत्तर देऊ, असे सांगितले.
महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये नीलम गोऱ्हे या स्वतः धावून जातात हे आपण पाहिले आहे. त्यांची उपसभापतीपदी दुसऱ्यांदा निवड झाली असून त्यांच्या यशाची कमान अशीच उंचावत जावो, अशा शुभेच्छा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नीलम गोऱ्हे यांना दिला.
दरम्यान, तीन आमदारांना करोना झाला आहे. तर चार आमदार पुरामुळे येऊ शकले नाहीत. अशा परिस्थितीत निवडणुकीची घाई का केली जात आहे, असा सवाल भाजपने यावेळी उपस्थित केला. विधान परिषद उपसभापती निवडणूक मुद्द्यावरून विरोधकांनी सभात्याग केला.