Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील आणि हजारो-लाखो आंदोलकांसाठी कालचा (दि. २७) दिवस अतिशय आनंदाचा होता. कारण मराठा आंदोलनाच्या या लढ्याला मोठे यश मिळाले आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत.
काल पहाटेच राज्य सरकारकडून त्याचे अध्यादेश काढण्यात आले आहेत. तो अध्यादेश मनोज जरांगे यांना सुपूर्द करण्यात आला. मात्र, सरकारच्या निर्णयावर राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
मनोज जरांगे यांनी सरकारकडे केलेल्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. त्यामुळे छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर टीका केली. यावेळी त्यांनी सरकारच्या निर्णयावर हरकती मागवण्यात येणार असल्याचे सांगितले.
तसेच येत्या १६ फेब्रुवारीपर्यंत हरकती मागवण्यात आल्या असल्याची माहिती दिली. यावेळी “झुंडशाहीने कायदा आणि नियम बदलता येत नाही”असे म्हणत पुन्हा एकदा मनोज जरांगे यांच्यावर टीका केली.
मात्र, आता भुजबळ यांच्या या नाराजीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीडियाशी संवाद साधताना छगन भुजबळ यांच्या नाराजीवर भाष्य केलं आहे.
ते म्हणाले, “काल मराठा आरक्षणाचा जो निर्णय घेतला, तो कुणबी नोंदी असताना प्रमाणपत्र मिळत नव्हता त्यांना प्रमाण पत्र मिळण्यासाठी होता. इतरांच्या हक्काला बाधा न पोहचत आम्हाला आरक्षण मिळावं ही जरांगे पाटील यांची मागणी होती.
अधिसूचनेत सर्व बाबी स्पष्ट पणे नमूद केल्या आहेत. ही अधिसूचना इतर समाजाला सुधा मार्गदर्शक ठरेल अशीच आहे. छगन भुजबळ आमचे सहकारी आहेत. त्यांनी या अधिसूचनेची माहिती घेतल्यानंतर त्यांचा गैरसमज दूर होईल,
असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. मराठा समाजाला आरक्षण देत असताना इतर समाजाला धक्का न लावता टिकणारं आरक्षण देण्यात येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.
‘सगेसोयरे’ या शब्दावरदेखील भुजबळांनी प्रतिक्रिया दिली….
सरकारने जरी अध्यादेशात सगेसोयरे या शब्दाचा उल्लेख केला असला तरी ‘सगेसोयरे’ कायदाच्या कसोटीवर टिकणार नाही” असा दावा यावेळी त्यांनी केला. त्यासोबतच मराठा समाज ओबीसीत आल्याने EWS च आरक्षण त्यांनी गमावले असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.
कुणबी समाजाच्या प्रमाणपत्रावर बोलताना भुजबळ म्हणाले….
‘जात जन्माने येते कोणत्या प्रमाणपत्राने येत नाही” अशी टीका केली. त्यासोबतच सरकारच्या निर्णयावर बोलताना ओबीसींवर अन्याय केला जात आहे. तसेच मराठ्यांना फसवलं जात आहे. याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. असे म्हणत भुजबळांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.
त्यासोबतच मराठा समाजाला निर्दशनास आणून द्यायचे आहे. सरकारच्या अध्यादेशानुसार आरक्षणत १७ टक्क्यात ८०-८५ टक्के ओबीसी येतील, त्यामुळे ही समाजाची फसवणूक असल्याचे भुजबळ यांनी यावेळी सांगितले. तसेच उद्या पाच वाजता भुजबळांच्या सरकारी निवासस्थानावर या मुद्द्यावर चर्चा करण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.