महाराष्ट्रातील “स्त्री’शिक्षणाची ज्यांनी मुहूर्तमेढ रोवली त्या “स्त्री’ शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई जोतिराव फुले यांची आज जयंती
सावित्रीबाई फुले यांचा जन्म आई लक्ष्मीबाई व वडील खंडोजी नेवसे पाटील या दाम्पत्याच्या पोटी 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे झाला. पुढे तत्कालीन रीतिरिवाजाप्रमाणे सावित्रीबाईंचा विवाह वयाच्या अगदी नवव्या वर्षीच जोतिराव गोविंदराव फुले यांच्याशी इ.स. 1840 मध्ये झाला.
लग्न होऊन फुले घराण्यात येण्याअगोदर सावित्रीबाई या निरक्षर होत्या, अक्षरांची कसलीही ओळख त्यांना नव्हती. पण लग्नानंतर सावित्रीबाईंनी शिकण्याची ही उणीव भरून काढली. त्यांच्या या शिकण्यामागचे श्रेय हे जोतिरावांचे होते. आपण जर इतिहासामध्ये डोकावून पाहिले तर ज्या-ज्या घराण्यातील स्त्रिया कर्तृत्व गाजवून गेल्या याचे कारण त्या-त्या घराण्यातील पुरुषांचा “स्त्री’ विषयक असलेल्या उदारमतवादी दृष्टिकोनात आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. महात्मा जोतिराव फुले यांनी आपली पत्नी सावित्रीबाई यांचे तत्कालीन स्त्रीजीवनानुसार “चूल आणि मूल’ एवढेच कार्यक्षेत्र मर्यादित न ठेवता त्यांच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाला उजाळा दिला. जोतिरावांच्याच सान्निध्यात सावित्रीबाईंना अक्षर ओळख झाली. एकूणच जोतिरावांच्याच तालमीत सावित्रीबाईंचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व घडत गेले. यातूनच सावित्रीबाईंना शिक्षणाचे महत्त्व पटल्यामुळे त्यांनी इतरांनाही ते पटवून दिले. महिलांसाठी, अस्पृश्यांसाठी प्रतिकूल परिस्थिती असतानाही शाळा सुरू केल्या.
दरम्यानच्या काळात त्यांना अध्यापिका, मुख्याध्यापिका या भूमिकांतून जाताना प्रचंड संघर्षालाही सामोरे जावे लागल्याचे दिसते. जोतिरावांनी घेतलेल्या प्रत्येक निर्णयाकडे सावित्रीबाई सकारात्मक दृष्टिकोनातून पाहात होत्या. त्या प्रत्येक अडीअडचणींच्या प्रसंगावेळी त्यांच्यासोबत ठामपणे उभ्या राहिल्याचे दिसतात. एकूणच महात्मा फुले यांनी हाती घेतलेल्या विविध कार्यांमध्ये सावित्रीबाई यांचाही हातभार असल्याचे दिसते. मग ते कार्य अस्पृश्योद्धाराचे असो, विधवांच्या कल्याणासाठीचे असो किंवा स्त्री शिक्षणासंबंधीचे असो या प्रत्येक कार्यात सावित्रीबाईंचा लाख मोलाचा वाटा असल्याचे दिसते.
ब्रिटिश शासनाच्या वतीने मेजर कॅन्डी यांच्या अध्यक्षतेखाली 16 नोव्हेंबर 1852 रोजी पुण्याच्या विश्रामबागेतील वाड्यात महात्मा जोतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांचा जो सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी ज्योतिराव सावित्रीबाईंना उद्देशून म्हणतात की, हा गौरव तुझाच आहे. मी शाळा स्थापण्यास कारणमात्र आहे. पण तू शाळा अनेक संकटांशी तोंड देऊन यशस्वीपणे चालविल्या, याचा मला अभिमान वाटतो. इतकेच काय तर पुढे मरणासन्न अवस्थेत असतानाही जोतिराव सावित्रीबाईंविषयी म्हणतात की, सावित्रीने माझ्या चरित्राबरोबरच पन्नास वर्षे प्रवास केला. तिच्यामुळेच मी लोकांचे भले करू शकलो. एकूणच प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते याचेच हे द्योतक म्हणावे लागेल. माणसाने सतत काही ना काहीतरी करीत राहावे, उद्योगी असावे, यातच त्याचे हित सामावलेले आहे. जर तो दैव, प्रारब्ध यावर विसंबून राहिला तर आळशी बनून त्याच्या प्रगतीचा मार्ग खुंटल्याशिवाय राहणार नाही. असा विचार सावित्रीबाई आपल्या भाषणातून व्यक्त करतात. एकूणच ‘देव व प्रारब्ध यांवर भार टाकून माणसाने निरुद्योगी बनू नये’ असा संदेश त्या आपल्या भाषणातून देतात.
आजच्या निरुद्योगी, आळशी बनत चाललेल्या युवक-युवतींनी या सावित्रीबाईंच्या अनमोल संदेशाचे अवश्य पालन केले पाहिजे.
त्याचप्रमाणे व्यसनी लोकांच्या सान्निध्यात राहिल्याने निर्व्यसनी लोकही पुढे या व्यसनाच्या आहारी जाऊन त्यांचेही कसे नुकसान होते यावरही सावित्रीबाई भाष्य करतात. त्यांच्या या विचारांतून आजच्या व्यसनाच्या विळख्यात सापडलेल्या युवक-युवतींनी धडा घेतला पाहिजे. सण-समारंभासाठी कर्ज काढून खर्च करणारी कुटुंबे कशी देशोधडीला लागतात याची उदाहरणेही सावित्रीबाईंनी लोकांना समजेल अशा भाषेतून पटवून दिली. त्याचे दुष्परिणामही सांगितले. पण आजही 21 व्या शतकात हे कर्ज काढून सण-समारंभ, लग्न-समारंभ साजरे करण्याचे वाढते प्रमाण व त्यामुळे कुटुंबाचे अतोनात होणारे नुकसान आपल्या नजरेस पडताना दिसते ही एक आजच्या घडीची शोकांतिकाच म्हणावी लागेल.
अशा या “स्त्री’ शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या, पती जोतिरावांच्या मृत्यूनंतर “सत्यशोधक समाजाची’ धुरा सांभाळणाऱ्या, “शिकण्यासाठी जागे व्हा’ असा संदेश देणाऱ्या, आपल्या भाषणातून मेहनतीचे, सदाचरणाचे, ज्ञानाचे, विद्येचे महत्त्व पटवून देणाऱ्या, व्यसनाचे व कर्जाचे दुष्परिणाम सांगणाऱ्या, सहनशीलता, समाजप्रियता, कणखरता हे गुण अंगी बाळगणाऱ्या “स्त्री’ शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना आजच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.