सातारा, (प्रतिनिधी) – १४ एप्रिल अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंतीदिन. हा दिवस महाराष्ट्रभर, देशभर, जगभर उत्साहात साजरा केला जातो. हा दिवस भारताच्या दृष्टीने नवी पिढी घडवणारा, नवनिर्माणाचे स्वप्न मुलांच्या मन, मेंदू अन् मनगटात सळसळत ठेवणारा दिवस आहे. म्हणूनच या दिवशी ‘एक वही एक पेन अभियान’ राबवून महामानवास अभिवादन केले जाणार आहे, अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिनाचे तथा विद्यार्थी दिवसाचे प्रवर्तक अरुण जावळे यांनी दिली.
महामानवास अभिवादन करण्यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून अनुयायी साताऱ्यात येत राहतात. या महामानवाची ओळख सिम्बॉल आॕफ नॉलेज अशी आहे. म्हणूनच दरवर्षीप्रमाणे या वर्षीही एक वही एक पेन या अभियानाच्या माध्यमातून अभिवादन केले जाणार आहे. तेव्हा येणाऱ्या अनुयायांनी येताना हारफुले घेऊन न येता एक वही आणि एक पेन सोबत आणावे व ते अर्पण करून अभिवादन करावे.
ग्रामीण खेड्यात, वाडी – वस्तीत, पालात – झोपडपट्टीत राहणारी असंख्य मूले अशी आहेत कि त्यांच्याकडे दप्तर, वह्या, पुस्तके, पेन नाहीत अशा मुलांपर्यंत या अभियानाअंतर्गत जे शैक्षणिक साहित्य जमा होईल ते पोहचवले जाणार आहे. जे अनुयायी वही पेन घेऊन येतील त्यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर येथे रविवार दि १४ एप्रिलला अर्थात जयंतीदिनी सकाळी ९ ते रात्री १२ वाजेपर्यत शैक्षणिक साहित्य स्वीकारले जाईल.
शाळाबाह्य मुलांना शाळेत आणावयाचे असेल, त्यांना शिक्षणाची गोडी लावायची असेल, एकही मूल शिक्षणापासून वंचित राहणार नाही हे पहावयाचे असेल आणि एकूणच शालेय शैक्षणिक चळवळ गतिमान करायची असेल तर १४ एप्रिल या जयंतीदिनाचे औचित्य साधून असे अभिनव उपक्रम किंवा अभियान सर्वत्र राबवणं गरजेचे आहे, असेही अरुण जावळे यांनी म्हटले आहे.