बरोबर साडेतीन वर्षांपूर्वी, कोलकात्यात भाजपच्या रोड शो दरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर पक्षाचे नेते अमित शहा यांनी एका पत्रकार परिषदेत ममता बॅनर्जी सरकारवर जोरदार हल्ला चढवला होता.
रोड शोला केंद्रीय राखीव पोलीस दलाचे संरक्षण नसते, तर माझा जीव वाचणे कठीण होते. झालेल्या हिंसाचारामध्ये तृणमूल कॉंग्रेस सरकारच्या पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली, असा आरोप त्यांनी केला. या रोड शोमध्ये काही विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला होता. तशी शक्यता अगोदरच वर्तवली गेली असूनही, पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली नाही, असा आरोप शहा यांनी केला होता. उलट या हिंसाचारात थोर समाजसुधारक आणि शिक्षणतज्ज्ञ ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची तोडफोड भाजपने केल्याचा प्रत्यारोप तृणमूलने केला होता.
अमित शहा हे खोटारडे आहेत असा आरोप करून, तृणमूल कॉंग्रेसचे राज्यसभेतील खासदार व प्रवक्ते डेरेक ओब्रायन यांनी आपला मुद्दा मांडण्यासाठी पत्रकार परिषदेत अनेक व्हिडिओ व फोटो दाखवले होते. मागच्या लोकसभा निवडणुकांत पश्चिम बंगालमध्ये भाजपला चांगले यश मिळाले; परंतु विधानसभा निवडणुकांत पुन्हा एकदा, म्हणजे सलग तिसऱ्या वेळी तृणमूलची सत्ता आली. अर्थात, त्यानंतरच्या काळात राज्यातील जालदा नगरपालिका तृणमूलच्या हातून गेली आहे. आता राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार असून, त्यात तृणमूलचा पराभव करण्यासाठी कॉंग्रेस व डाव्या आघाडीने भाजपशी हातमिळवणी करावी, असे आश्चर्यकारक आवाहन भाजप खासदार सौमित्र खान यांनी केले आहे.
कॉंग्रेस व डाव्या पक्षांनी ही सूचना तत्काळ धुडकावून लावताना, भाजप व तृणमूलचे वर्णन “एकाच नाण्याच्या दोन बाजू’ या शब्दांत केले आहे. उलट पश्चिम बंगालमध्ये भाजप, कॉंग्रेस व कम्युनिस्ट यांचे संगनमत असल्याचा आरोप तृणमूल कॉंग्रेसने केला आहे. खान यांच्या मते, पंचायतींच्या निवडणुकीत बूथ पातळीवर तृणमूल विरुद्ध इतर सर्व, अशीच लढाई आहे. अर्थात कॉंग्रेस व कम्युनिस्टांना बदनाम करण्यासाठी भाजप नेते या प्रकारची युक्ती करत असतात. आगामी निवडणुका लक्षात घेऊन, तृणमूलच्या सर्वेसर्वा व राज्याच्या मुख्यमंत्री ममतादीदींनी “दीदीर सुरक्षा कवच’ या योजनेचा शुभारंभ करण्याचे ठरवले आहे. 11 जानेवारीस शुभारंभ होणार असून, तृणमूलचे साडेतीन लाख पक्ष कार्यकर्ते दीदींच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्यासाठी दोन कोटी कुटुंबांना भेट देणार आहेत.
अन्नसुरक्षा, घरे, स्वास्थ्य साथी, कन्याश्री, कृषक बंधू, जय बांगला पेन्शन स्कीम, युवाश्री अशा वेगवेगळ्या योजनांची माहिती घरोघरी जाऊन दिली जाईल. भाजपदेखील लोकसभा तसेच विविध राज्यांतील विधानसभा निवडणुकांत अशाच प्रकारे आपल्या योजनांची माहिती देऊन राजकीय फायदा उठवत असतो. तृणमूलने यशाचा तोच फॉर्म्युला उचलला असल्याचे दिसते. या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पंचायत निवडणुकांच्या प्रचारासाठी अनेक प्रचारसभा घेण्याचे ठरवले आहे. या सभांचा उपयोग 2024च्या लोकसभा निवडणुकांसाठीही पक्षाला होणार आहे.
केंद्रात कॉंग्रेस सत्तेवर असताना ग्रामपंचायत, जिल्हा परिषदा अथवा पालिका निवडणुकांमध्ये त्या पक्षाचे केंद्रीय नेतृत्व कधीही लक्ष घालत नव्हते; परंतु भाजपने मात्र प्रत्येक निवडणूक गंभीरपणे घेण्याचे ठरवले असून, विधानसभा निवडणुकांचा वचपा काढण्याचा निर्धार केला आहे. भाजपकडे राज्यस्तरावर सर्व जनता ज्याला ओळखते, असा चेहरा नाही. शिवाय पक्षांतर्गत गटबाजी भरपूर आहे. नव्या-जुन्या नेत्यांमध्ये संघर्ष आहे. त्यामुळेदेखील केंद्रीय नेतृत्वाला अधिकाधिक सभा घ्याव्या लागत आहेत. 2019च्या लोकसभा निवडणुकांत भाजपने 42 पैकी 18 जागा जिंकल्या होत्या. ज्या ठिकाणी पक्षाचा पराभव झाला, अशा 24 लोकसभा मतदारसंघांमध्ये यंदा नड्डा व शहा यांच्या प्रत्येकी 12 प्रचारसभा होणार आहेत. याखेरीज, भाजपचे स्टार प्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिश्म्याचाही लाभ उठवण्यात येणार आहे. भाजपचे नियोजन अत्यंत सूक्ष्म असते आणि विविध पाहण्यांच्या आधारे व्यूहरचना निश्चित केली जाते. कार्यकर्ते केवळ निवडणुकांच्या वेळीच नव्हे, तर सततच जनतेच्या संपर्कात असतात. नेते आणि मंत्री तर सततच प्रचार करत असतात. इतर पक्षांनी भाजपकडून या गोष्टी खरोखरच शिकण्यासारख्या आहेत.
गेल्या काही महिन्यांत ममतादीदींचा भाजपविरोध किंचित मवाळ झाला आहे. त्यांच्या भाच्याविरुद्ध तपास यंत्रणांमार्फत विविध चौकशा सुरू आहेत. त्याचा हा परिणाम असल्याचे बोलले जाते. परंतु तरीदेखील तृणमूलचा मुख्य प्रतिस्पर्धी भाजपच आहे, यात शंका नाही. मनरेगा तसेच केंद्राच्या विविध योजनांमध्ये तृणमूलच्या अनेक नेत्यांनी भ्रष्टाचार केला आहे, असा भाजपचा आरोप आहे. राज्यातील ढासळती कायदा व सुव्यवस्था परिस्थिती आणि तृणमूलचा दहशतवाद या प्रश्नांवर भाजप हल्लाबोल करत आहे. 2021च्या राज्य विधानसभा निवडणुकांतही भाजपने राज्यात बडे बडे केंद्रीय नेते आणून प्रचाराचा धूमधडाका केला होता. भाजपने प्रचार व दौऱ्यांवर अक्षरशः करोडो रुपये खर्च केले होते. तृणमूलच्या अनेक मंत्री व नेत्यांवर छापे टाकण्यात आले होते. सीबीआय व ईडीच्या पथकांना सातत्याने कोलकात्यास धाडण्यात येत होते.
टेलिव्हिजन, वृत्तपत्रे आणि वेबसाइट्सच्या माध्यमातून, तृणमूल सरकार हे भ्रष्ट व नादान असून त्याने जंगलराज आणले असल्याची प्रतिमा निर्माण करण्यात आली. हे सर्व असूनदेखील दीदींनी भाजपचे हे सर्व “हातखंडे’ परतवून लावले आणि विजय मिळवला. याचे कारण, तृणमूलची संघटना मजबूत व सक्रिय आहे. त्यामुळे भाजपच्या या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी पंचायत निवडणुकांतही तृणमूल प्रयत्नांची शिकस्त करेल, अशीच चिन्हे आहेत. मात्र, या निवडणुका रंगतदार होणार, यात शंकाच नाही.