सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील एका लग्नाची सध्या राज्यभरात चर्चा सुरू आहे. यामध्ये आयटी इंजिनिअर असणाऱ्या जुळ्या बहिणींनी एकाच तरुणाबरोबर विवाह केला आहे.
जुळ्या बहिणींचा एकाच तरुणाबरोबर विवाह ही घटना तशी दुर्मिळ स्वरूपाचीच म्हणावी लागेल. कारण, कायद्याला बगल देऊन दोन विवाह करणारी उदाहरणे समाजात अनेक दिसून येतात. विवाहबाह्य संबंधांची प्रकरणेही आपल्याकडे नवी नाहीत. कालोघात लिव्ह इन रिलेशनशिपसारखा प्रकारही दिसून येतो; परंतु एकाच वेळी एकाच कुटुंबातील सख्ख्या जुळ्या बहिणींनी एकाच तरुणाशी विवाह करण्याचे दुर्मिळ उदाहरण आहे. या दोन तरुणींनी असा निर्णय का घेतला, त्यामागचा हेतू काय आहे हे अनाकलनीय आहे. कारण जुळ्या भावंडांचे, बहिणींचे स्वतंत्र विवाह होत नाहीत असेही नाही. शेकडो-हजारोंच्या संख्येने जुळ्या मुलामुलींचे स्वतंत्र विवाह झालेले आहेत आणि ते आपले वैवाहिक जीवन जगत आहेत. त्यामुळं नेमक्या कोणत्या भूमिकेतून या जुळ्या बहिणींनी असा निर्णय घेतला असा प्रश्न सर्वांनाच पडला.
अर्थात हेतू काहीही असला तरी मुस्लीम वैयक्तिक कायदे वगळता सर्वच विवाह कायद्यांनुसार एका व्यक्तीला एका वेळी एकच विवाह करण्याची परवानगी आहे. द्विभार्या प्रतिबंधक कायदा म्हणजे बॉम्बे प्रिव्हेन्शन ऑफ हिंदू बायगेमस ऍक्ट 1946 या कायद्यांतर्गत हिंदू विवाहित स्त्री अथवा पुरुष पहिल्या पती अथवा पत्नीपासून विभक्त न होता दुसरे लग्न करू शकत नाही. तसे केल्यास या दुसऱ्या विवाहाला कायदेशीर मान्यता मिळत नाही. उलट यासाठी सात वर्षे तुरुंगवासाच्या शिक्षा होऊ शकते. भारतीय दंडसंहितेच्या कलम 494 नुसार हा जामीनपात्र, अदखलपात्र गुन्हा आहे. आताच्या प्रकरणामध्ये नवरा आणि दोन्ही जुळ्या मुली या तिघांपैकी एकाने या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे. परंतु या तिघांचीही या विवाहाला संमती असल्यामुळे कोणीही यासंदर्भात गुन्हा दाखल करणार नाही. आता जी कारवाई होते आहे ती त्रयस्थ व्यक्तीने तक्रार दाखल केल्यामुळे किंवा महिला आयोगाने त्यावर आक्षेप घेतल्यामुळे होत आहे; परंतु अशी केस न्यायालयामध्ये टिकून राहू शकत नाही. कारण या तिघांनाही या विवाहाबद्दल काहीही आक्षेप नाहीये.
या पार्श्वभूमीवर विवाहसंस्थेचा विचार करताना एक लग्न कायदेशीर मानले जात असेल आणि दुसरा विवाह बेकायदेशीर मानला जात असेल तरी जर स्त्री-पुरुष विवाहानंतरही नवरा-बायकोसारखे एकत्र राहात असतील तर ते लिव्ह इन रिलेशनशिप मानले जाते. त्यामध्ये कौटुंबिक नाते असले तरी विवाह म्हणून त्याला कायदेशीर अधिमान्यता नाहीये. त्यामुळे जोपर्यंत या तिघांमधील नातेसंबंध सामंजस्याच्या, सहमतीच्या पायावर सुरळितपणाने सुरू राहतील तोपर्यंत कसलाच प्रश्न उद्भवणार नाही. परंतु जेव्हा कायदेशीर पत्नी म्हणून ओळख प्रस्थापित करण्याचा मुद्दा येईल तेव्हा वादविवाद उद्भवू शकतात. पुढे जाऊन त्यांना अपत्ये झाली तर मुलांच्या बाबतीत हा प्रश्न उद्भवणार नाही. कारण सर्वोच्च न्यायालयाने एका जुन्या निर्णयानुसार मुले बेकायदेशीर किंवा अनौरस नसतात. त्यामुळे मुलांना वारस म्हणून समान हक्क मिळतील.
प्रश्न हा असेल की कोणत्या मुलीबरोबरचे लग्न हे कायदेशीर आहे. या प्रकरणातील आणखी एक गुंतागुंत म्हणजे हा विवाह एकाच दिवशी, एकाच मंडपात, एकाच वेळी पार पडला आहे. त्यामुळे त्यातील कोणते लग्न कायदेशीर आहे, हे ठरवणे अवघड आहे. सामान्यतः दुसऱ्या विवाहांची प्रकरणे घडतात तेव्हा ती वेगवेगळ्या वेळी घडलेली असतात. साहजिकच त्यावेळी पहिला विवाह कोणाशी झाला आहे, ही बाब स्पष्ट असते. त्यामुळे द्विभार्या प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाईची प्रक्रियाही सहजपणाने पार पाडता येते. या प्रकरणात तशीही स्थिती नाहीये. त्यामुळे इथे हा कायदा कसा लागू होणार याबाबतही प्रश्नचिन्ह आहे. असे असले तरी कालोघात कायदेशीर पत्नी ठरवताना कायदेशीर जोडीदार कोण, हा मुद्दा वादाचा ठरेल यात शंका नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे, लग्न म्हणजे केवळ एक दिमाखदार सोहळ्यापुरते मर्यादित नाहीये. विवाहानंतर जोडीदाराबरोबर हळूहळू प्रेमाचे नाते खुलत जाते. त्यातून परस्परांमध्ये सामंजस्यपणा वाढत जाऊन, भावनिक बंध निर्माण होऊन सहजीवन आकाराला येते. रुसवेफुगवे, वादविवाद, भांडणे, तडजोडी यातून ते नाते विकसित होत जात असते. हे लक्षात घेता एकाच वेळी दोघींबरोबर हे नाते कसे खुलत जाणार? दोघींबरोबर समसामायिक भावबंध कसे जोडले जाणार? पुढे जाऊन अनुरूपतेचे मुद्दे उपस्थित होऊ शकतात का? या दोघी जुळ्या बहिणी असल्या तरी त्या दोन स्वतंत्र व्यक्ती आहेत. त्यांचे व्यक्तिमत्व, स्वभाव, विचार, वर्तणूक, मानसिकता, आकलनक्षमता आदी अनेक बाबतीत भिन्नता असणे स्वाभाविक आहे. अशा वेळी त्यांच्यात तुलना केली जाऊ शकते का? त्यातून काही वाद उद्भवू शकतात का? थोडक्यात, विवाह सोहळा पार पडला असला तरी पुढील काळात कौटुंबिक वैवाहिक नातेसंबंध कसे राहतात यावर या नात्याचे, विवाहाचे भवितव्य अवलंबून असणार आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे विवाह झाल्यानंतर त्याची नोंदणी करणे कायद्याने बंधनकारक आहे. परंतु रजिस्ट्रेशन केले नाही तरी विवाह सोहळा पार पडलेला असल्यामुळे त्यांचे लग्नच झाले नाही असे कोणी म्हणत नाही. न्यायालयातही ते लग्न स्वीकारले जाते; पण या प्रकरणामध्ये कोणते लग्न रजिस्टर करणार हाही प्रश्नच आहे. कारण एका वेळी दोन विवाह रजिस्टर करता येत नसल्यामुळे या तिघांना एकाही लग्नाची नोंदणी करता येणार नाहीये. आज समाजात किती तरी विवाह नोंदणीविना झालेले आहेत आणि होतही आहेत; परंतु एखादी समस्या निर्माण झाली आणि त्यावेळी कदाचित विवाह नोंदणीचा मुद्दा उपस्थित होऊ शकतो. अशी वेळ आल्यास हे तिघे काय करणार?
थोडक्यात, नव्याचे नऊ दिवस या आपल्याकडील प्रचलित उक्तीनुसार सुरुवातीला जोपर्यंत सारं काही आलबेल आहे, सुखनैव सुरू आहे तोपर्यंत या तिघांनाही यामध्ये काहीच गैर वाटणार नाही. उलट आम्ही तिघेही कसे आनंदाने राहात आहोत किंवा राहू शकतो हे दाखवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. पण पुढे जाऊन जेव्हा या नात्याचा कस लागणारे प्रसंग येतील किंवा कसोटीचे क्षण येतील तेव्हा त्यातून काही वाद उद्भवले तर मात्र त्यावेळची गुंतागुंत ही अधिक क्लिष्ट असेल.
आज समाजात विवाहबाह्य संबंध अनेक ठिकाणी दिसतात. ते चूक की बरोबर हे ठरवण्याचा हक्क समाजाला नाही. कारण तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न असतो. पण या प्रकरणामध्ये दोन विवाह झालेले आहेत आणि ते कायद्याच्या दृष्टीने बेकायदेशीर आहेत. त्यामुळे पुढे जाऊन दोन्ही बहिणींपैकी कुणा एकीचे हक्क डावलले जाणार आहेत, हे निश्चित आहे. सुशिक्षित असणाऱ्या या जुळ्या बहिणींना याची पूर्ण कल्पना असणार आहे. तरीही त्यांनी असा निर्णय कसा घेतला, हे आश्चर्यकारक आहे.
महिला आयोगाच्या तक्रारीनंतर सुरू झालेल्या चौकशीतून सदर तरुणाचा यापूर्वी एका मुलीशी विवाह झाल्याचे समोर आले आहे, असे वृत्त माध्यमातून प्रसारित झाले आहे. त्यामध्ये तथ्य असेल तर मात्र कायदेशीर गुंतागुंतीचा प्रश्न उरणार नाही. सदर तरुणीने तक्रार दाखल केल्यास द्विभार्या प्रतिबंधक कायद्यान्वये या तरुणाने जुळ्या बहिणींशी केलेले दोन्हीही विवाह बेकायदेशीर ठरणार आहेत.